[ad_1]
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री आणि भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून दिवंगत शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटकेंविरोधात निवडणूक न लढण्याची विनंती केली. तसेच भाजपाला महाराष्ट्राच्या संस्कृतीची आठवण करून दिली. यानंतर अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत मनसे शिवसेना उमेदवार ऋतुजा लटकेंना पाठिंबा देणार का याविषयी तर्कवितर्क लावले जात आहेत. अशातच राज ठाकरे अंधेरी निवडणुकीत शिवसेनेला पाठिंबा देतील का? असा प्रश्न अरविंद सावंत यांना विचारण्यात आला. यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली. ते रविवारी (१६ ऑक्टोबर) एबीपी माझाशी बोलत होते.
अरविंद सावंत म्हणाले, “अंधेरीत राज ठाकरे यांनी शिवसेनेच्या उमेदवार ऋतुजा लटके यांना पाठिंबा द्यावा की नाही हा त्यांचा प्रश्न आहे. त्यांनी ही पहिली भूमिका मांडली त्याला थोडा उशीर झाला. असं असलं तरी ही भूमिका स्वागतार्ह आहे. ती महाराष्ट्राची संस्कृती आहे. त्यांनी या संस्कृतीची भाजपाला आठवण करून दिली हेही खूप झालं.”
“नाव आणि पक्षचिन्ह गोठवलं, मग शिंदे गट उभा राहिला का?”
“उशीर झाला हे मी म्हटलो कारण उमेदवारी अर्ज भरूपर्यंत बराच वेळ गेला. मधल्या काळात तमाशा करण्यात आला. शिंदे गटाने निवडणूक आयोगाकडे विधानसभेची निवडणूक लागली आहे असं सांगत शिवसेनेचं नाव आणि पक्षचिन्ह गोठवायला लावलं. ते उभे राहिले का?” असा प्रश्न अरविंद सावंत यांनी विचारला.
“शिंदे गटाचा वापर करून शिवसेनेचं खच्चीकरण”
“हा प्लॅन कोणाचा? हे षडयंत्र भाजपाचंच होतं. शिंदे गट हातातील बाहुले आहेत. त्यांचा वापर करून शिवसेनेचं खच्चीकरण सुरू आहे. हे एकच भाजपाचं उद्दिष्ट आहे,” असा आरोप अरविंद सावंत यांनी केला.
“भाजपाने शिवसेना संपवण्यासाठी शस्त्र म्हणून एकनाथ शिंदेंचा वापर”
अरविंद सावंत पुढे म्हणाले, “भाजपाने एकदाही म्हटलं नाही की आम्ही निवडणूक लढणार आहोत की नाही. तेव्हा शिंदे गटाला झुंजवत ठेवलं. त्यांचा हेतू शिवसेना संपवायची हाच होता. त्यासाठी त्यांनी शस्र म्हणून एकनाथ शिंदेंचा वापर केला.”
राज ठाकरेंनी एक पाऊल टाकलं, आता शिवसेना टाकणार का?
राज ठाकरेंनी पत्र लिहून एक पाऊल टाकलं, आता शिवसेना एक पाऊल टाकणार का? या प्रश्नावर अरविंद सावंत यांनी बोलणं टाळलं. “हा विषय पुढे नेऊ नका. त्यांनी महाराष्ट्राची संस्कृती जपण्याचं वक्तव्य केलं आहे. आम्ही त्याचं स्वागत करतो,” असं अरविंद सावंत यांनी म्हटलं.
हेही वाचा : “भाजपाने उमेदवार मागे घ्यावा”, राज ठाकरेंच्या पत्रावर शिवसेनेकडून पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “थोडा उशीर…”
राज ठाकरेंच्या पत्रानंतर भाजपा उमेदवारी अर्ज मागे घेईल का?
राज ठाकरेंच्या पत्रानंतर भाजपा उमेदवारी अर्ज मागे घेईल का? प्रश्नावर भाजपा उमेदवारी अर्ज मागे घेईल असं मला वाटत नाही, असं मत अरविंद सावंतांनी व्यक्त केलं.
[ad_2]