[ad_1]
सुहास सरदेशमुख, लोकसत्ता
औरंगाबाद : शिवसेनेचे मराठवाडय़ातील १२ पैकी आठ आमदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना साथ दिली. हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनीही आता शिंदे गटाची वाट धरल्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची पाठराखण करणाऱ्यांमध्ये आता दोन खासदार आणि विधानसभेत निवडून आलेले तीन लोकप्रतिनिधी उरले आहेत. परिणाम असा की आता बीड,लातूर, नांदेड, जालना व हिंगोली या जिल्ह्यांमध्ये शिवसेनेतील निवडून आलेले लोकप्रतिनिधी शिल्लक राहिले नाहीत.
औरंगाबाद व उस्मानाबाद जिल्ह्यात सेनेत फूट झाली. मात्र, परभणी जिल्ह्यातील शिवसेनेतील आमदार व खासदार उद्धव ठाकरे यांच्यासमवेत राहिले आहेत. विधानसभेत निवडून येणारा लोकप्रतिनिधी शिंदे गटात यायला हवा, असे प्रयत्न केले गेले असल्याचे दिसून येत आहे. त्यात आता खासदारांची भर पडली आहे.
परभणी लोकसभा मतदारसंघातून निवडणून येणारे खासदार संजय जाधव यांनी काही वर्षांपूर्वी राष्ट्रवादी कॉग्रेसकडून अन्याय होत असल्याची भावना लेखी स्वरूपात शिवसेना पक्षप्रमुखांकडे कळविली होती. तत्कालीन पालकमंत्री
नवाब मलिक यांनी सेना कार्यकर्त्यांवर अन्याय केल्याचे ते म्हणाले होते. परभणी वैद्यकीय महाविद्यालय उभे करण्यासाठी राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे तसेच बाजारसमितीमधील वाद सोडविल्यामुळे त्यांनी राष्ट्रवादी विरोधातील धार कमी केली. खासदार जाधव भाषा जरी शिंदे गटासारखी असली तरी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासमवेत राहण्याचा निर्णय घेतला. परभणी लोकसभा मतदारसंघात ‘ खान की बाण ’ हा प्रचाराचा प्रमुख केंद्रबिंदू असतो. त्यामुळे अधिक कट्टर शिवसैनिक निवडून येतो हे माहीत असल्याने खासदार जाधव हे उद्धव ठाकरे यांच्यासमवेत थांबले असल्याचे सांगण्यात येते.
उस्मानाबाद मतदारसंघात तुळजापूरचे आमदार राणा जगजीतसिंह पाटील हे भाजपमध्ये असल्याने राजकीयदृष्टय़ा टिकाव धरायचा असेल तर शिवसेनेशिवाय पर्याय नसल्याने उस्मानाबादचे खासदार ओम राजेिनबाळकर पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबरोबर थांबले. शिंदे गटाकडून त्यांनाही संपर्क करण्यात आला होता. मात्र, त्यांनी शिवसेनेमध्येच थांबण्याचा निर्णय घेतला. आता मराठवाडय़ात उद्धव ठाकरे यांच्यासमवेत थांबणाऱ्यांच्या यादीत औरंगाबादमधील विधानसभेत निवडून आलेले उयदसिंह राजपूत, उस्मानाबादचे कैलास पाटील, परभणीचे डॉ. राहुल पाटील असे तीन आमदार व दोन खासदारांचा समावेश आहे. मराठवाडय़ातून विधान परिषदेतील आमदार व औरंगाबादचे जिल्हा प्रमुख अंबादास दानवे आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे हे आता शिवसेनेची पदाधिकाऱ्यांच्या पातळीवर अधिक पडझड होणार नाही, यासाठी रोज अनेकांना दूरध्वनी करीत आहेत. समर्थनात कोण आणि शिंदे गटात कोण याचा रोज तपशील गोळा केला जात आहे. शिवसेनेतील फुटीनंतर निवडून आलेल्या सदस्यामध्ये मराठवाडय़ाचा वाटा अजूनही मोठा असल्याचे दिसून येत आहे.
[ad_2]