[ad_1]
महाराष्ट्रात विधानसभेच्या मध्यावधी निवडणुका कधीही घोषित होण्याची शक्यता असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघातील संपर्क प्रमुखांच्या बैठकीत ठाकरे बोलताना उद्धव ठाकरेंनी मध्यावधी निवडणुकीची शक्यता व्यक्त करताना कार्यकर्त्यांना तयारीला लागण्याच्या सूचनाही दिल्या. उद्धव ठाकरेंच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात चर्चा रंगली असून प्रतिक्रिया उमटत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही यावर भाष्य केलं आहे. ते पालघरमध्ये आयोजित कोकण महोत्सव कार्यक्रमात बोलत होते.
“आम्हाला निवडणुकांची भीती नाही. निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून काम करत नसल्याने आम्हाला त्याची तयारी करण्याची गरज नाही,” असं एकनाथ शिंदेंनी म्हटलं आहे. तसंच, मध्यावधी निवडणुकांचं लॉजिक काय? हा संभ्रम का निर्माण करत आहात? अशी विचारणाही त्यांनी केली.
मध्यावधी निवडणुका होतील असं का म्हणालात? उद्धव ठाकरेंनी दिलं उत्तर, म्हणाले “अचानक पंतप्रधानांच्या तोंडी…”
“त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. आपल्याकडील आमदार, लोकप्रतिनिधी सोडून जाता कामा नये यासाठी ते अशी वक्तव्यं करत आहेत. आघाडीतील पक्षही शिवसेना आमचा नैसर्गिक मित्रपक्ष नसल्याचं म्हणत आहे. काँग्रेसमधील २२ जण भाजपात जाणार, तसंच काही लोक फुटून बाळासाहेबांच्या शिवसेनेत जाणार असल्याचं बोललं जात आहे. आपली लोकं थांबवून ठेवण्यासाठी संभ्रम निर्माण करण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे,” असा दावा एकनाथ शिंदेंनी केला.
Andheri By Poll: ऋतुजा लटके यांच्या विजयानंतर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले “मशाल भडकली आणि…”
“आपलं १७० आमदारांचं मजबूत सरकार आहे. अडीच वर्ष पूर्ण ताकदीनं काम करु आणि लोकांच्या अपेक्षा पूर्ण करु हे त्यांना माहिती आहे. म्हणून ते घाबरले असून अशी विधानं करत आहेत. अडीच वर्षानंतर जनता काम करुन देणाऱ्या लोकांनाच निवडून देणार आहे. तेव्हा आमच्या २०० हून अधिक जागा येतील,” असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे.
काय म्हणाले उद्धव ठाकरे?
राज्यात अस्थिर राजकीय परिस्थिती असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही मोठय़ा घोषणा करायला सुरुवात केली आहे. गुजरातमध्येही त्यांनी मोठे प्रकल्प व गुंतवणुकीच्या घोषणा केल्या व निवडणुका जाहीर झाल्या. राज्यातील सरकारमध्ये अस्थिरता असून काही आमदार नाराज असून फुटण्याचा विचार करीत आहेत. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल काही काळाने अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर मध्यावधी निवडणुकांची शक्यता ठाकरे यांनी व्यक्त केली. त्यामुळे आपले सरकार असताना केलेली कामगिरी घरोघरी पोचविण्याचे आवाहन ठाकरे यांनी केलं.
विधानावर स्पष्टीकरण
‘मातोश्री’वर आयोजित पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंना त्यांच्या विधानामागचं कारण विचारण्यात आलं असता ते म्हणाले, निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केंद्र सरकार मोठ्या गोष्टी करत असतं. गुजरातच्या निवडणुका जाहीर होईपर्यंत महाराष्ट्रात येणारे जमिनीवरील प्रकल्प तिथे ओरबाडून नेले. आणि आता अचानक पंतप्रधानांच्या तोंडातून महाराष्ट्राबद्दल प्रेम व्यक्त होऊ लागलं आहे. जमिनीवरील प्रकल्प गुजरातला आणि हवेतील प्रकल्प महाराष्ट्रात आणले जात आहेत. हे प्रकल्प जाहीर केल्यानंतर या प्रकल्पांचा भ्रमाचा भोपळा फुटण्याआधी मध्यावधी निवडणुका जाहीर होऊ शकतात असा माझा अंदाज आहे.
[ad_2]