[ad_1]
शिवसेनेच्या बंडखोर आमदारांविरोधात अपात्रतेची याचिका पक्षानं दाखल केली असून त्यावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर नेमकं या सुनावणीत काय होणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. शिंदे गटातील आमदार अपात्र ठरल्यास नेमकं काय होणार? याविषयी देखील आता अंदाज बांधले जाऊ लागले आहेत. यावर आता कायदेतज्ज्ञ उल्हास बापट यांनी राज्यघटनेत नेमकं काय म्हटलंय, याचा दाखला देत स्पष्टीकरण दिलं आहे. तसेच, संसदेत बंडखोर खासदारांनी वेगळा गट स्थापन केला असून त्याला कायदेशीर आधार आहे का, यावर देखील बापट यांनी टीव्ही ९ शी बोलताना भूमिका मांडली आहे.
आमदारांच्या अपात्रतेचं काय?
शिवसेनेकडून बंडखोर आमदारांच्या आपात्रतेची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. त्यासोबतच, नव्याने राज्यात स्थापन झालेलं सरकारच अवैध असल्याचा देखील दावा करणारी दुसरी याचिका दाखल झाली आहे. यासंदर्भात राज्य सरकारच्या भवितव्यावरच टांगती तलवार असल्याचं बोललं जात असताना उल्हास बापट यांनी त्यावर स्पष्टीकरण दिलं आहे. “त्यांच्यावर पक्ष सोडल्याबद्दल कारवाई झाली आहे. विरोधात मतदान केल्याबद्दल नाही. ती जर पक्षानं केली असेल आणि ते जर अपात्र झाले, तर त्याचा अर्थ असा होतो की त्यांना मंत्री राहाता येणार नाही”, असं बापट म्हणाले आहेत.
पक्षांतरबंदी कायद्यानुसार मंत्रीपद जाणार?
दरम्यान, पक्षांतरबंदी कायद्यानुसार ते दोषी ठरले, तर त्यांची मंत्रीपदं जातील, ते अपात्र ठरतील असं बापट म्हणाले आहेत. “इतर प्रकरणांत अपात्र ठरल्यानंतर देखील मंत्री राहाता येतं. ६ महिन्यांच्या आत निवडून येता येतं. पण पक्षांतरबंदी कायद्यानुसार जर अपात्र ठरले, तर त्यांना मंत्री राहाता येत नाही. पुन्हा निवडून आल्यानंतरच मंत्री होता येतं. त्यामुळे खूपच कठीण परिस्थिती निर्माण होईल. कारण मुख्यमंत्रीच गेले, तर सरकारच बरखास्त होऊ शकतं. त्यामुळे पुढची सगळीच परिस्थिती बदलेल”, असं उल्हास बापट यावेळी म्हणाले.
राज्यात नेमकं काय घडेल?
दरम्यान, शिंदे गटातील आमदार अपात्र ठरल्यास राज्यात काय परिस्थिती उद्भवेल, यावर देखील उल्हास बापट यांनी भूमिका मांडली आहे. “एक तर राष्ट्रपती राजवट लागू करण्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते किंवा देवेंद्र फडणवीसांच्या मागे जर काही कारणाने काही आमदार जाऊन बहुमत निर्माण झालं तर त्यातून नवीन सरकार स्थापन होऊ शकतं. पण तो सगळा राजकीय तर्क-वितर्कांचा भाग आहे”, असं बापट म्हणाले.
[ad_2]