[ad_1]
राज्यात सध्या निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीमध्ये तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. एकीकडे बंडखोर आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय अद्याप सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असताना दुसरीकडे राज्यात मंत्रीमंडळ विस्तार अजूनही रखडलेला आहे. त्यामुळे विरोधकांच्या हाती आयतं कोलीत आलं असून राज्य सरकारला लक्ष्य केलं जात आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी एक सूचक ट्वीट केलं असून त्यामुळे राजकीय वर्तुळात नवी चर्चा सुरू झाली आहे. आमदारांच्या अपात्रतेच्या निकालाची टांगती तलवार असणाऱ्या शिंदे सरकारच्या भवितव्यावर आता राऊतांच्या ट्वीटनंतर चर्चा होऊ लागली आहे.
शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिंदे गटासोबत गेलेल्या अनेक आमदारांनी संजय राऊतांना या फुटीसाठी कारण ठरवलं आहे. राऊतांवर अनेकांनी आरोप देखील केले आहेत. या पार्श्वभूमीवर संजय राऊत सध्या राज्याच्या राजकारणात चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. त्यांच्यावर बंडखोरांकडून वारंवार आरोप केले जात असताना खुद्द उद्धव ठाकरेंकडून राऊतांवरील आरोपांबद्दल कोणतीही भूमिका जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे बंडखोर गट आणि शिवसेना यांच्यातील दरी दिवसेंदिवस अधिकाधिक वाढत चालली आहे.
राऊतांनी केली राष्ट्रपती राजवटीची मागणी
दुसरीकडे राज्यात सुरू असलेल्या सत्तानाट्याच्या पार्श्वभूमीवर संजय राऊतांनी शनिवारी रात्री केलेल्या ट्वीटमध्ये राष्ट्रपती राजवटीची मागणी केली आहे. “बार्बाडोसची लोकसंख्या अवघी अडीच लाख आहे, पण तरीही त्यांच्या मंत्रिमंडळात २७ मंत्री आहेत. महाराष्ट्राची लोकसंख्या १२ कोटी असूनही इथे २ मंत्री हवे तसे निर्णय घेत आहेत. इथे राज्यघटनेचं पालन होतंय का? जोपर्यंत सर्वोच्च न्यायालय यासंदर्भात निर्णय देत नाही, तोपर्यंत महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी”, अशी मागणी त्यांनी ट्वीटमधून केली आहे.
राजभवनावरील फोटो केला ट्वीट!
दरम्यान, आज सकाळी राऊतांनी ट्वीट करून सूचक इशारा दिला आहे. संजय राऊतांनी बहुमताचं पत्र राज्यपालांना देत असताना देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि इतर भाजपा नेत्यांचा फोटो ट्वीट केला आहे. या ट्वीटसोबत त्यांनी एक शेर देखील लिहिला आहे. “उनकी मुस्कुराहट पर न जाना, दिआ तो कब्र पर भी जल रहा है!” असं राऊत ट्वीटमध्ये म्हणाले आहेत. यासोबत त्यांनी सगळ्यात शेवटी “वेट अँड वॉच” असा सूचक उल्लेख देखील केला आहे.
आता नेमका राऊतांच्या वेट अँड वॉचचा काय संदर्भ आहे? यावरून तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे.
[ad_2]