[ad_1]
शिवसेनेच्या ‘धनुष्यबाण’ चिन्हाला गोठवण्याचा हंगामी आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केल्यानंतर शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी शिंदे गटावर सडकून टीका केली आहे. “शिवसेना आमची असल्याची वल्गना करणाऱ्यांनी बाजारात आपल्या आईला विकलं” असा हल्लाबोल शिंदे गटावर पेडणेकर यांनी केला आहे. “शिंदे आणि चाळीस चोर” असा उल्लेख करत शिंदे गटाचे कमळ हेच चिन्ह असल्याचे पेडणेकर यांनी म्हटले आहे.
निवडणूक आयोगाने शिवसेनेचं चिन्ह गोठवल्यानंतर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर राजकीय क्रौर्य किती भयाण आहे, याची प्रचिती आली असल्याचे पेडणेकर म्हणाल्या आहेत. आम्ही खचणार नाही, घाबरणार नाही, आम्ही या संकटाचा जोमाने सामना करू, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. “शिवसेना पक्ष नव्हे तर कुटुंब आहे, हे दसरा मेळाव्याच्या दिवशी सर्वांनी पाहिलं. त्यानंतरच लवकर निर्णय घेण्याची गडबड करण्यात आली. अंधेरी पोटनिवडणुकीत लढणार नव्हते. मात्र तरीही शिंदे गटाने कारण नसताना पक्षचिन्हावर दावा केला”, असा आरोप पेडणेकर यांनी केला आहे. शिवसेनेला या उंबरठ्यावर आणले, त्या एकनाथ शिंदेंविषयी महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात चीड आहे. आगामी निवडणुकांमध्ये जनतेची चीड दिसून येईल, असे पेडणेकर यांनी म्हटले आहे.
शिवसेनेच्या चिन्हाबाबत निवडणूक आयोगाने घेतलेल्या निर्णयावर शरद पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले…
पक्षचिन्हाच्या निर्णयानंतर पेडणेकर यांनी भाजपा अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यावरही निशाणा साधला आहे. “गेल्या चार महिन्यात नड्डा आणि केंद्रातील वाचाळवीर याबाबत बोलत होते. त्यामुळे असा निर्णय अपेक्षित होता. वाचाळविरांच्या तोंडून निघालेले शब्द निवडणूक आयोगाच्या कानात कुणीतरी सांगत होतं” असा आरोप पेडणेकर यांनी केला आहे. तुम्ही शिवसेना नाव संपवू शकता, चिन्ह गोठवू शकता, पण बाळासाहेबांची चिंगारी आणि उद्धव ठाकरेंना संपवू शकत नाही, असे प्रत्युत्तर पेडणेकर यांनी नड्डांना दिले आहे. बाळासाहेब ठाकरेंचे नाव घेण्यापासून उद्धव ठाकरेंना कोणीही थांबवू शकत नाही, असेही त्यांनी माध्यमांशी बोलताना ठणकावून सांगितले.
[ad_2]