[ad_1]
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय घटनापीठाने महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील प्रकरणाची पुढील सुनावणी २७ सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलली. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या निर्णयावर प्रतिक्रिया दिलीय. “शिवसेना कुणाकडे हा तांत्रिक भाग आहे. ठाकरे कुणाकडे याला जास्त महत्त्व आहे,” असं मत जयंत पाटलांनी व्यक्त केलं. तसेच उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरे यांची परंपरा चालवत आहेत, असंही नमूद केलं. ते बुधवारी (७ सप्टेंबर) एबीपी माझाशी बोलत होते.
जयंत पाटील म्हणाले, “घटनापीठ कालच (६ सप्टेंबर) स्थापन झालं आहे. त्याप्रमाणे त्यांनी या प्रकरणाची पुढील तारीख २७ सप्टेंबर दिली असेल. त्यावेळी काय होतं बघू. शेवटी न्यायालयाचेही प्राधान्यक्रम असू शकतात. काल घटनापीठ स्थापन झालं आहे आणि आज लगेच बसलं पाहिजे अशी अपेक्षा करणंही योग्य नाही. त्यांना त्यांचा वेळ दिला पाहिजे. मात्र, २७ सप्टेंबरला पुन्हा दोन महिन्यांची तारीख आली तर तो वेळकाढूपणा होईल. मात्र, मला खात्री आहे न्यायालय तसं करणार नाही.”
शिवसेना कुणाकडे हा तांत्रिक भाग आहे. ठाकरे कुणाकडे याला जास्त महत्त्व आहे असं मला वाटतं. उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरे यांची परंपरा चालवत आहेत. महाराष्ट्रातील तमाम शिवसैनिक उद्धव ठाकरेंनाच प्राधान्य देतील. एखाद्याच्या हातात सगळंच असेल तर त्याचा वापर कसा करायचा हे तेच ठरवत असतात. मात्र, न्यायालय त्याबाबत योग्य निर्णय करेल याची मला खात्री आहे.
घटनापीठात काय झालं?
‘निवडणूक चिन्हासंदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगासमोरील सुनावणीला स्थगिती देऊ नये’, असा अर्ज मंगळवारी (६ सप्टेंबर) शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात दाखल केला. त्यावर, आज (७ सप्टेंबर) न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय घटनापीठासमोर तातडीने सुनावणी घेण्यात आली. या घटनापीठाने या प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलली आहे. यावर आता २७ सप्टेंबरला सुनावणी होऊन निर्णय येणार आहे.
निवडणूक आयोगाने शिवसेनेच्या पक्षचिन्हाबाबत निर्णय न घेण्याचे लेखी आदेश दिले आहेत का अशी विचारणा घटनापीठाने सुनावणीत केली. याशिवाय दोन्ही पक्षांची बाजू समजून घेतली. यानंतर घटनापीठाने २७ सप्टेंबरला या प्रकरणी दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकून निर्णय देऊ, असं स्पष्ट केलं. तसेच निवडणूक आयोगाला २७ सप्टेंबरपर्यंत या प्रकरणात कोणताही निर्णय घेऊ नये, असे निर्देश दिले.
दरम्यान, याआधी शिंदे गटाने शिवसेना पक्षावर आणि पक्षाचं निवडणूक चिन्ह धनुष्यबाणावर आपला हक्क असल्याचा दावा करत निवडणूक आयोगाकडे त्यासाठी अर्ज केला होता. याला ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान देत या प्रकरणी निवडणूक आयोगाला निर्णय घेण्यापासून रोखावं अशी मागणी केली होती. या सुनावणीनंतर आता निवडणूक आयोग या प्रकरणात निर्णय घेऊ शकणार की नाही हे २७ सप्टेंबरलाच स्पष्ट होणार आहे.
[ad_2]