[ad_1]
राज्यात सत्तांतर झाल्यानंतर एकीकडे शिवसेना आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू असताना दुसरीकडे शिवसेनेतल्याच काही गटांमध्ये अंतर्गत वाद सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर अनेक नेते, माजी आमदार संजय राऊतांवर टीका करत आहेत. शिवसेनेतल्या बंडाळीला संजय राऊतच जबाबदार असल्याची टीका ते करत आहेत. या पार्श्वभूमीवर माजी आमदार विजय शिवतारे यांनी संजय राऊतांवर बोचरी टीका केली आहे.
संजय राऊत नावाच्या माणसानं शिवसेनेची तारांबळ करून टाकली, असं त्यांनी म्हटलं आहे. एका कार्यक्रमात कार्यकर्त्यांना संबोधित करताना शिवतारे म्हणाले की, “हे बंड नाही, ही गद्दारी नाही, ही खुद्दारी आहे. आम्ही उद्धवसाहेबांना कधीही डावलेलं नाही. आम्ही उद्धवसाहेबांना मानतो, आदित्य साहेबांना देखील तेवढंच मानतो. पण संजय राऊत नावाच्या माणसानं शिवसेनेची तारांबळ करून टाकली आहे. त्यांना स्किझोफ्रेनिया नावाचा एक मनोविकार झाला आहे. हा विकार सामान्य माणसाला होत नाही, अतिहुशार माणसालाच होतो, असं डॉक्टर सांगतात. अशा व्यक्तीला वेगवेगळे भास होत असतात, त्याला जे भास होतात, ते सर्व खरंच आहेत, असं त्याला वाटायला लागतं.”
हेही वाचा- “…तर त्यांच्या कानाखाली आवाज काढा” बंडखोर आमदार संजय बांगर यांचा धमकीवजा इशारा
“सुरुवातीला त्यांना भास झाला आणि राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं, शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला. गोव्यात आपलं सरकार येणार आणि तिथेही शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार, हा त्यांना (संजय राऊतांना) झालेला दुसरा भास होता. त्यावेळी राऊत आदित्यदादाला घेऊन तिकडे (गोव्याला) गेले, भाषणं वगैरे करायला लावली. तेव्हा देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं होतं, आमची लढाई शिवसेनेशी नाही, शिवसेनेची लढाई नोटासोबत (NOTA- None of the above) आहे,” असंही शिवतारे म्हणाले.
हेही वाचा- “स्किझोफ्रेनिया नावाचा एक रोग असतो, अशा माणसाला…”, सेनेतून हकालपट्टीनंतर विजय शिवतारेंचं संजय राऊतांवर टीकास्त्र!
दरम्यान, शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आल्यानंतर शिवतारेंनी आज सकाळी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. “२९ जूनला पत्रकार परिषद घेऊन पुण्यात माध्यमांसमोर मी माझी भूमिका मांडली होती. त्यात मी स्पष्टपणे म्हटलं होतं की महाविकास आघाडी आम्हाला मान्य नाही. आम्ही सगळे शिवसेनेतच आहोत. उद्धव ठाकरेंनी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत फारकत घ्यावी, सगळं ठीक होईल. शिंदेंचीही भूमिका हीच होती. याच कारणासाठी एकनाथ शिंदेंसोबत गेलो. पण उद्धव ठाकरे हे करायला तयार नव्हते. २९ जूनलाच मी माझी भूमिका स्पष्ट केली होती. मीच आधी शिवसेनेतून बाहेर पडलो होतो. ते माझी काय हकालपट्टी करणार? हे का करावं लागतं हा प्रश्न आहे. हे फक्त राजकारण नाहीये”, असं स्पष्टीकरण शिवतारे यांनी दिलं आहे.
[ad_2]