[ad_1]
सांगली : इस्लामपूर, विट्यासह जिल्ह्यातील पाच नगरपालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्या असून १८ ऑगस्ट रोजी मतदान होणार आहे. मार्च २१ पासून याठिकाणी प्रशासक राजवट असून आजपासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. या निवडणुकीत नव्याने सत्तेवर आलेल्या शिंदे गटासह भाजप, राष्ट्रवादी व कॉंग्रेस नेत्यांची कसोटी लागणार आहे.
इस्लामपूर, आष्टा, विटा, तासगांव आणि पलूस नगरपालिकांची मुदत मार्चमध्ये समाप्त झाली. ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत. करोनाचा संसर्ग आणि ओबीसी आरक्षण या मुद्द्यामुळे निर्धारित मुदतीत निवडणुका होऊ शकल्या नाहीत. दरम्यानच्या कालावधीत मुदत संपताच प्रशासक नियुक्त करण्यात आले होते.
राज्यात सत्ताबदलानंतर प्रथमच या निवडणुका होत असल्याने राजकीय नेत्यांचा कस लागणार आहे. इस्लामपूर व आष्ट्यामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व माजी पालकमंत्री जयंत पाटील, पलूसमध्ये माजी सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, विट्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडात सहभागी असणारे शिवसेनेचे आ. अनिल बाबर आणि तासगावमध्ये भाजपचे खा. संजयकाका पाटील यांची कसोटी लागणार आहे.
या नगरपालिका निवडणुकीसाठी २२ ते २५ जुलै उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत असून उमेदवारी माघार घेण्याचा अंतिम मुदत ४ ऑगस्ट, मतदान १८ऑगस्ट आणि मतमोजणी १९ ऑगस्ट रोजी होणार आहे.
[ad_2]