[ad_1]
मुंबई : पुढारी, उपहारगृहचालक, दुकानदार आणि अधिकाऱ्यांच्या मर्जीनुसार राज्यभरात अनधिकृत गतिरोधकांचे फुटलेले पेव रोखण्यासाठी आता मुख्यमंत्र्यांनीच कारवाईचा बडगा उगारला आहे. राष्ट्रीय महामार्गापासून गल्लीबोळापर्यंत प्रत्येक रस्त्यांवर जागो जागी उभारण्यात आलेले अनाधिकृत गतिरोधक तातडीने हटविण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागास दिले आहेत.
वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी, अपघाती क्षेत्र, वळण, रस्ता ओलांडण्याची ठिकाणे, पेट्रोल पंप आदी ठिकाणी गतिरोधक लावण्याची कायदेशीर तरतूद असतानाही राज्यात गेल्या काही वर्षांत मनमानीपणे गतिरोधक उभारण्याचे पेव फुटले आहे. राष्ट्रीय महामार्गावर गतिरोधक उभारण्यास बंदी असतानाही अनेक ठिकाणी महामार्गाला लागून असलेले हॉटेलवाले आपल्या व्यवसायाकडे लोकांना आकर्षित करण्यासाठी अधिकाऱ्यांना हाताशी धरून किंवा स्वत:च गतिरोधक उभारतात. राज्य, जिल्हामार्ग आणि ग्रामीण रस्त्यांबाबतही निकष आणि निमय असतानाही जागोजागी १०- १० मीटरवरही गतिरोधक उभारले जात आहेत. शहरात तर नगरसेवक आणि पालिका अधिकाऱ्यांच्या मर्जीनुसार गरज नसतानाही गतिरोधक उभारले जात आहेत. अपघाताला नियंत्रण घालण्यासाठी गतिरोधक अपेक्षित असताना प्रत्यक्षात मात्र गतिरोधकामुळेच अपघातामध्ये वाढ होत असल्याची बाब सरकारच्या निदर्शनास आली आहे. त्यामुळे नियमबाहय सर्व गतिरोधरक हटविण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले.
लवकरच कारवाई
गतिरोधक हे वाहनचालकांना आणि लोकांनाही त्रास होऊ नये, अपघात होऊ नयेत यासाठी आहेत. त्यासाठी काही नियमही आहेत. मात्र अलिकडच्या काळात गतिरोधकांचे पेवच फुटले असून त्याबाबत कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. त्यानुसार कारवाईबाबतचे आदेश लवकरच सर्व सबंधितांना दिले जातील अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
[ad_2]