[ad_1]
Ayodhya Ram Mandir : अयोध्येतल्या राम मंदिरात रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा पार पाडली आहे. पंतप्रधान मोदींच्या हस्ते विधिवत पूजा करुन रामलल्ला यांची प्रतिष्ठापना करण्यात आली. या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्याचं भाग्य संपूर्ण देशाला लाभलं आहे. पूजेवेळी रामलल्लांच्या गर्भगृहात पंतप्रधान मोदींसह सरसंघचालक मोहन भागवत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राज्यपाल आनंदीबेन पटेल उपस्थित होत्या. यावेळी राम जन्मभूमि तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी तिथल्या उपस्थितांना उद्देषून भाषण केलं. चंपत राय यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. राम मंदिराच्या उभारणीसाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून योगदान आल्याचे त्यांनी सांगितले.
चंपत राय हे श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्राचे सरचिटणीस आहेत. याशिवाय ते विश्व हिंदू परिषदेचे नेते आणि उपाध्यक्षही आहेत. 2020 मध्ये जेव्हा राम मंदिराचे बांधकाम सुरू झाले तेव्हा त्यांना मंदिर ट्रस्टचे सरचिटणीस म्हणून नियुक्त करण्यात आले. या सोहळ्यात बोलताना राम मंदिरासाठी देशभरातून दोन्ही हातांनी देणग्या आल्याचे चंपत राय यांनी सांगितले. देशाचा असा एकही कोपरा नाही जिथून प्रभू रामासाठी भेट आली नाही, असे चंपत राय म्हणाले.
“उत्तर प्रदेशातील एटा जिल्ह्यात असलेल्या जलेसरच्या लोकांनी स्वेच्छेने 24 क्विंटलची घंटा पाठवली आहे. गुजरातच्या डबगर समाजाच्या लोकांनी स्वेच्छेने मोठा नगाडा पाठवला आहे. जनकपूर, मिथिला म्हणजेच सीतामढी, बक्सर आणि श्री रामाचे जन्मस्थान छत्तीसगड येथून अनेक भार आले आहेत. या भारमध्ये धान्य, चिवडा, सुका मेवा अशा वस्तू आहेत. जोधपूर येथील एका साधूने बैलगाडीवर तूप भरून आणले आहे. मंदिरात जमिनीखालील माती (पाया) मजबूत केल्यावर त्यासाठीची माती मध्य प्रदेशातील छतरपूर येथून आली आहे. कर्नाटक आणि तेलंगणातून ग्रॅनाइट आले. मंदिरासाठीचे दगड राजस्थानमधील भरतपूर येथून आले आहेत,” असे चंपत राय यांनी सांगितले.
“पांढरा संगमरवर राजस्थानातील मकराना येथून आला आहे. मंदिराच्या दरवाजाचे लाकूड महाराष्ट्रातील बल्लारशाहचे आहे. त्यांना सोन्याचा मुलामा चढवण्यात आला आहे. मुंबईतील एका हिरे व्यापाऱ्याने ही भेट दिली आहे. मूर्ती बनवणारा कारागीर अरुण योगीराज हा म्हैसूरचा आहे. मंदिराबाहेर गरुड देव आणि हनुमान जी यांच्या मूर्ती जयपूरचे शिल्पकार सत्यनारायण यांनी बनवल्या आहेत. लाकडी दरवाजांवर कोरीव काम हैदराबादच्या अनुराधा टिंबर यांनी केले आहे. त्यांचे सर्व कारागीर कन्याकुमारी, तामिळनाडू येथील होते. राणा मार्बल, धूत, नकोडा आणि रमजान भाई यांनी संगमरवरी कामात सर्वाधिक योगदान दिले आहे. दिल्लीचे रहिवासी मनीष त्रिपाठी यांनी देवाच्या मूर्तीसाठी कपडे तयार केले आहेत. जयपूरमधून देवाचे दागिने बनवले आहेत,” असेही चंपत राय म्हणाले.
कोण आहेत मोहम्मद रमजान?
मोहम्मद रमजान यांनी राम मंदिरातील सिंहासनसह श्री राम मंदिराच्या गर्भगृहाच्या भिंती, दरवाजे, फरशी आणि पायऱ्यांवर वेगवेगळ्या मनमोहक कलाकृती तयार केल्या आहेत. मोहम्मद रमजान हे राजस्थानमधील नागौर जिल्ह्यातील मकराना येथील रहिवासी आहे. राम मंदिरासाठी गेल्या 25 वर्षांपासून ते मकराना मार्बल्सचे काम करत होते. मोहम्मद रमजान यांच्याकडे 650 ते 700 कारागीर होते. हे सर्वजण दगडी कोरीव काम करत होते पण हे काम राम मंदिरासाठी सुरू आहे हे कुणालाही माहीत नव्हते. याची माहिती फक्त मोहम्मद रमजान यांनाच होती.
[ad_2]