[ad_1]
शिंदे-फडणवीस सरकारने राज्यात शिधाधारकांना १०० रुपयांमध्ये दिवाळी फराळासाठी चार वस्तू देण्याची घोषणा केली. यानंतर ही शिधा पोहचवण्यासाठी खास पिशव्याही छापण्यात आल्या. या पिशव्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फोटोही छापण्यात आले आहेत. मात्र, या पिशव्यांचा तुटवडा पडल्याने या शिधा वितरणातही उशीर होत असल्याचा आरोप होतोय. दिवाळी तोंडावर येऊनही अद्याप अनेक जिल्ह्यांमध्ये या वस्तू वितरणासाठी पोहचल्या अनेक तक्रारी येत आहेत. या पार्श्वभूमीवर सरकारला घराघरात शिधा पोहचवायचा आहे की राजकारण्यांचे चेहरे असा प्रश्न राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री आणि भाजपा नेते रविंद्र चव्हाण यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते गुरुवारी (२० ऑक्टोबर) एबीपी माझाशी बोलत होते.
रविंद्र चव्हाण म्हणाले, “शिधामध्ये चार वस्तू आहेत. यात चणाडाळ, रवा, पामतेल यांचा समावेश आहे. पामतेल पहिल्यांदाच देण्यात येतंय. ते तेल असल्यामुळे त्याला सेपरेशन करणं गरजेचं आहे. एखादी पिशवी फुटली आणि ते एकत्र झालं तर इतर सर्व वस्तू खराब होतील. म्हणून यासाठी पिशव्यांमध्ये वेगवेगळं करावं असं सांगण्यात आलं. हा शासनाने निर्णय घेतलाय. त्यात प्रसिद्धीचा विषय नाही. कोणतंही शासन शासकीय योजना लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी प्रयत्न करतं.”
“आम्ही दिवाळीआधी शिधा पोहचवण्याचा प्रयत्न करतो आहे”
“गोरगरिबांपर्यंत हा आनंदाचा शिधा दिवाळीच्या आधी पोहचला पाहिजे हा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. दिवाळीच्या काळात या गोष्टींची मागणी जास्त असते. त्यामुळे उशीर होतो. त्या गोष्टी वेळेत पोहचायला हव्यात म्हणून आम्ही शासन म्हणून प्रयत्न करत आहे. इतर राज्यांमध्ये यासाठी २१ ऑक्टोबरपासून २८ ऑक्टोबरपर्यंत कालावधी वाढवून देण्याचा विचार सुरू आहे. मात्र, आम्ही दिवाळीआधी शिधा पोहचवण्याचा प्रयत्न करतो आहे,” असं मत रविंद्र चव्हाण यांनी व्यक्त केलं.
दिवाळीचा शिधा पोहचण्यासाठी इतका उशीर का?
दिवाळीचा शिधा सर्वसामान्य शिधाधारकांच्या घरात पोहचण्यासाठी इतका उशीर का? असा प्रश्नही विचारण्यात आला. यावर रविंद्र चव्हाण म्हणाले, “घोषणा ते माल विकत घेणं आणि नंतर वाहतूक व्यवस्था करून ते ठिकठिकाणी पोहचवणं या प्रक्रियेला सात दिवस झाले आहेत.”
हेही वाचा : दिवाळीपासून ‘धन्यवाद मोदीजी’ प्रचार धडाका ; लाभार्थी मतदारांसाठी जिल्ह्याजिल्ह्यांतून पोस्टकार्ड वितरित
“विदर्भातून मुंबईत वाहतूक करताना तीन ते चार दिवस लागतात”
“याआधी गहू, तांदूळ पोहचवण्याच्या प्रक्रियेलाही तेवढाच वेळ लागतो. विदर्भातून मुंबईत वाहतूक करताना तीन ते चार दिवस लागतात. त्यामुळे एवढा कालावधी गृहित धरावाच लागेल. असं असली तरी यंत्रणेने झोकून देऊन काम करायला हवं,” असंही त्यांनी नमूद केलं.
[ad_2]