[ad_1]
शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आदित्य ठाकरे सध्या महाराष्ट्रात वेगवेगळ्या जिल्ह्यात दौरे करत आहेत. मंगळवारी औरंगाबाद येथील आक्रोश मेळाव्याला आदित्य ठाकरे यांनी संबोधित केलं. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या आणि तरुणांच्या भावनांशी खेळणाऱ्या सरकारचा खरपूस समाचार घेतला. राज्यात अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना अद्याप आर्थिक मदत मिळाली नाही, राज्यातील उद्योग परराज्यात जात असल्यामुळे राज्यातून तरुणांचा रोजगार हिरावला जातोय, अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली.
महाराष्ट्राने आतापर्यंत देशाला दिशा देण्याचं काम केलंय. महाराष्ट्रात देशाची आर्थिक राजधानी आहे, येथे सुपीक जमीन आहे, कुशल तरुण आहेत. तरीही या राज्यातून प्रकल्प परत जात आहेत. परराज्यात प्रकल्प जाण्याचं वाईट वाटत नाही. पण आपल्या राज्यात आलेले प्रकल्प इथे न थांबता, परराज्यात जातायत याचं अधिक वाईट वाटतंय. महाराष्ट्राने आवाज बुलंद केला नाही, तर देश मागे जाईल. महाराष्ट्र पुढे गेला तर देशही पुढे जाईल. पण गद्दार ५० खोक्यात अडकले आहेत. स्वतःचं इमान विकणारे महाराष्ट्राचा मान काय राखणार? असा सवालही आदित्य ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांना विचारला.
गृहमंत्र्यांना आजवर एवढं हतबल पाहिलं नाही
राज्यातील प्रकल्प बाहेर गेले तर मोठा प्रकल्प राज्यात आणू, असं म्हणणारे देवेंद्र फडणवीस अद्याप मोठा प्रकल्प आणू शकले नाहीत. ‘गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आजवर एवढं हतबल कधीही पाहिलं नाही. आजवर कायदा आणि सुव्यस्थेचा एवढा बोजवारा उडालेला पहिला नाही, असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी सरकारमधील बेताल वक्तव्य करणाऱ्या मंत्र्यांचा समाचार घेतला.
हेही वाचा- “२४ तासांत अब्दुल सत्तारांची हकालपट्टी करावी, अन्यथा…” मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना राष्ट्रवादीचा थेट इशारा
राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. गद्दार आमदार म्हणतात ‘चुन चुन के मारेंगे’, पण ते पाठीत वार करून पळून जातात आणि म्हणतात चुन चुन के मारेंगे. तर कोणी पोलीस ठाण्यात गोळीबार करतं. पण कारवाई होत नाही. तर काही मंत्री संविधानिक पदावर असणाऱ्या महिलेला अश्लील भाषेत शिवीगाळ करतात, पण तरीही कोणतीही कारवाई न करता केवळ समज दिला जातो, अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली आहे.
[ad_2]