[ad_1]
एकमेकांना नेहमीच पाण्यात पाहणारे, एकमेकांना विरोध करणारे, विचारधारा समान नसणारे विरोधक आमच्या विरोधात किती वेळाही एकत्र आले तरी तरीही त्यांचा समर्थ मुकाबला करण्यास भाजपा नेहमीच खंबीर आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांचा समाचार घेतला. कार्तिकी एकादशीनिमित्त विठ्ठलाच्या शासकीय महापुजेसाठी फडणवीस गुरूवारी सायंकाळी पंढरपुरात दाखल झाले. त्यावेळी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी विरोधकांवर हल्ला चढविला.
हेही वाचा- शिंदे-फडणवीसांनी मध्यस्थी करूनही राणांकडून ‘घरात घुसून मारू’ असं वक्तव्य का? बच्चू कडू स्पष्टच म्हणाले…
उध्दव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर हे दोघे राजकीय युती करणार असल्याच्या हालचाली होत असल्यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर फडणवीस यांनी प्रतिक्रिया नोंदविली. उध्दव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर जेव्हा खरोखर एकत्र येतील, तेव्हा बघू, असे उत्तर फडणवीस यांनी दिले. परंतु एरवी, एकमेकांच्या विरोधात भूमिका घेणारे, भिन्न विचारधारा असणारे, आदर्शमूल्ये वेगळी असणारे विरोधक केवळ आमच्या विरोधात म्हणून एकत्र येतात. मात्र अशा विरोधकांशी मुकाबला करायला भाजपा नेहमीच समर्थ राहिला आहे आणि यापुढेही तेवढ्याच ताकदीने मुकाबला करणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
हेही वाचा- “कुणीतरी माझी काळजी करणारं आहे हे ऐकून…”, संजय शिरसाट यांचा सुषमा अंधारेंच्या ‘त्या’ विधानावरून टोला!
कार्तिकी एकादशीला विठ्ठलाची शासकीय महापूजा करताना महाराष्ट्र सुखी, सुजलाम् सुफलाम् व्हावा, महाराष्ट्राचा सर्वागीण विकास व्हावा, हेच मागणे विठ्ठलाच्या पायाशी मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले. पंढरपूरचा विकास आराखडा तयार होत असून स्थानिक भौगोलिक, सांस्कृतिक परिस्थितीनुसार विकास आराखडा राबविण्यासाठी शासन कटिबध्द राहणार असल्याची ग्वाही फडणवीस यांनी दिली.
[ad_2]