सोलापूर; दि.17- परराज्यातील 166 नागरिकांना उपप्रादेशिक परिवहन कार्यालय आणि एसटी महामंडळ तसेच जिल्हा प्रशासन यांच्यामार्फत महाराष्ट्राच्या लगतच्या सीमा तपासणी नाक्यापर्यंत पोहोच करण्यात आले.
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अधिकारी संजय डोळे यांच्या मार्गदर्शनाखाली व सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी सतीश जाधव यांच्या निरीक्षणाखाली छत्तीसगड व मध्यप्रदेश येथील एकूण 56 प्रवाशांना पाणी, जेवण व बसची सोय करुन देण्यात आली.
सोलापूर शहर व परिसरातील मध्यप्रदेश येथील 30, झारखंड येथील 20, छत्तीसगड येथील 20, उत्तरप्रदेश येथील 22, विजापूर येथील 18 प्रवाशांना आज महाराष्ट्र राज्याच्या लगतच्या सीमा तपासणी नाक्या पर्यंत पाठविण्यात आले. या सर्व प्रवाशांची जेवणाची व पाण्याची व्यवस्था जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आली.
उपजिल्हाधिकारी दीपक शिंदे, तहसीलदार डी एस कुंभार, एस टी महामंडळाचे व्यवस्थापक आदींनी नियोजन केले. सोलापूर शहर व जिल्ह्यात अडकून पडलेल्या नागरिकांना परराज्यात पाठवण्याची व्यवस्था केली जात आहे. यासाठी ऑनलाईन व ऑफलाईन नाव नोंदणी करुन घेऊन त्यांना एसटी बस तसेच रेल्वेने मूळ गावी सोडण्यात येत आहे. जिल्हा प्रशासनाकडून परजिल्ह्यात व इतर राज्यात जाणाऱ्या नागरिकांची नाव नोंदणी करून घेण्यात येत आहे.