[ad_1]
महाराष्ट्रात विधानसभेच्या मध्यावधी निवडणुका कधीही घोषित होण्याची शक्यता असल्याचं विधान माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केल्यानंतर या विधानावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मध्यावधी निवडणुकांच्या चर्चा वायफळ असल्याचं मत व्यक्त करताना राज्यातील भारतीय जनता पार्टी आणि बाळासाहेबांची शिवसेना या दोघांचं सरकार मजबूत असल्याचं म्हटलं आहे. मुंबईमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना उद्धव ठाकरेंच्या दाव्यासंदर्भात फडणवीसांना प्रश्न विचारला असता त्यांनी या विषयावर आपलं मत व्यक्त केलं.
राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघातील संपर्क प्रमुखांच्या बैठकीत ठाकरे बोलताना उद्धव ठाकरेंनी मध्यावधी निवडणुकीची शक्यता व्यक्त करताना कार्यकर्त्यांना तयारीला लागण्याच्या सूचनाही दिल्या. उद्धव ठाकरेंच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात चर्चा रंगली असून प्रतिक्रिया उमटत आहेत. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केंद्र सरकार मोठ्या गोष्टी करत असतं. गुजरातच्या निवडणुका जाहीर होईपर्यंत महाराष्ट्रात येणारे जमिनीवरील प्रकल्प तिथे ओरबाडून नेले. आणि आता अचानक पंतप्रधानांच्या तोंडातून महाराष्ट्राबद्दल प्रेम व्यक्त होऊ लागलं आहे. जमिनीवरील प्रकल्प गुजरातला आणि हवेतील प्रकल्प महाराष्ट्रात आणले जात आहेत. हे प्रकल्प जाहीर केल्यानंतर या प्रकल्पांचा भ्रमाचा भोपळा फुटण्याआधी मध्यावधी निवडणुका जाहीर होऊ शकतात असा माझा अंदाज आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले. उद्धव ठाकरेंच्या याच विधानावर फडणवीसांनी प्रतिक्रिया नोंदवली आहे.
उद्धव ठाकरेंनी मध्यावधी निवडणुका लागतील असं मत व्यक्त केल्याचा संदर्भ देत फडणवीस यांना काय वाटतं असं पत्रकाराने विचारलं. त्यावर उत्तर देताना फडणवीस यांनी, “आता अनेक पक्षांना भिती वाटू लागली आहे. देशातील आणि महाराष्ट्रातील वातावरण पाहून अनेक पक्ष घाबरले आहेत. कदाचित आपले आमदार आपल्या पक्षात टिकणार नाही अशी भिती या पक्षांना वाटत आहे. त्यामुळेच आपल्या पक्षातील आमदारांना भिती दाखवण्यासाठी अशी विधानं केली जात आहेत. या भितीपोटी गेलात तरी पुढे निवडणूक लागणार आहे असं वातावरण तयार करण्याचा हा प्रयत्न आहे,” असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.
आज काँग्रेसची ‘भारत जोडो यात्रा’ महाराष्ट्रात येत असल्याचा संदर्भ देतही फडणवीसांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना फडणवीस यांनी, “या यात्रेचा महाराष्ट्राच्या राजकारणावर फार परिणाम होईल असं वाटतं नाही,” असं फडणवीस म्हणाले. तसेच ही यात्रा नियोजित कार्यक्रमांनंतर सुखरुप बाहेर जाईल अशी व्यवस्था आम्ही सरकार म्हणून करु, असंही फडणवीसांनी स्पष्ट केलं. “ही भारत जोडो नाही ही मोदींना हटवण्यासाठी मोदी हटाओ यात्रा आहे. ही विरोधक जोडो यात्रा आहे. मोदी लोकांच्या मनात आहेत. कितीही यात्रा काढाल्या तरी मोदींची जागा स्थिर आहे,” असंही फडणवीस यांनी म्हटलं.
“भाजपामध्ये रोज लोक येतात. भारत जोडो असो किंवा इतर काहीही केलं तरी लोक भाजपाकडे येणार आहेत. देशाला मोदी जे नेतृत्व देत आहेत त्यामुळे लोक येत आहे. सक्षम नेतृत्व पाहून लोक भाजपामध्ये येतात,” असंही फडणवीस यांनी म्हटलं.
[ad_2]