[ad_1]
मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत मिळाणाऱ्या सामान्य नागरिकांच्या सदनिका हस्तगत केल्या आहेत, असा आरोप भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. मागील काही दिवसांपासून सोमय्या पत्रकार परिषदांच्या माध्यमातून या आरोपाशी संबंधित वेगवेगळी कागदपत्रे सादर करत आहेत. आजदेखील त्यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेत पेडणेकर यांनी लोकांच्या सदनिका हस्तगत केल्याचा दावा केला आहे. तसेच एसआरएने याबाबत सदनिकांच्या मालकांना नोटीस पाठवलेली आहे, असेही सोमय्या यांनी सांगितले आहे. पेडणेकर यांनी वरळी येथील गोमाता जनता एसआरए येथील सदनिका हस्तगत करण्यासाठी सुनिल कदम नावाच्या व्यक्तीला संजय अंधारी असल्याचे दाखवून सदनिका हस्तगत केल्याचा आरोप केला आहे. तसेच संजय अंधारी नावाच्या माणसाला पेडणेकर यांनी हजर करावे, असे खुले आव्हानही सोमय्या यांनी पेडणेकरांना दिले आहे.
हेही वाचा >>> ‘अद्याप वाद संपला नाही’ म्हणणाऱ्या बच्चू कडूंची आज अमरावतीमध्ये बैठक, दिव्यांग व्यक्तीच्या माध्यमातून भूमिका स्पष्ट करणार
“किशोरी पेडणेकर तसेच बेनामी गाळे हस्तगत करणाऱ्या त्यांच्या सहकाऱ्यांना झोपडपट्टी विकास प्राधिकरणाने नोटीस पाठवलेली आहे. त्यांनी वरळी येथील गोमाता जनता एसआरए येथील सदनिका बेनामी पद्धतीने ताब्यात घेतलेल्या आहेत. वर्षानुर्षे या सदनिका त्यांच्या ताब्यात आहेत. त्यामुळेच ही नोटीस पाठवण्यात आली. उद्धव ठाकरे यांनी माझ्या तक्रारी दाबल्या होत्या. चौकशी होऊ दिली नाही. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआरएला योग्य ती चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. किशोरी पेडणेकर गोमाता जनता नगरात कुलूप घेऊन गेल्या होत्या. अशी नौटंकी करू नये. २०१७ सालच्या निवडणुकीमध्ये पेडणेकर यांनी आपल्या शपथपत्रात या गाळ्याचा पत्ता दिला होता. त्यानंतर मी आता गेल्यानंतरही त्यांच्याच ताब्यात हे गाळे असल्याचे मला समजले,” असा दावा सोमय्या यांनी केला.
हेही वाचा >>>‘आरोपांच्या धसक्यामुळे माझ्या सासूबाईंचं निधन’ किशोरी पेडणेकरांच्या आरोपानंतर आता किरीट सोमय्यांची प्रतिक्रिया; म्हणाले
“एसआरएने ज्या लोकांना नोटिशी पाठवलेल्या आहेत, ती माणसे कोठे आहेत, हे फक्त पेडणेकर यांनाच माहिती आहे. एसआरएच्या सदनिका पेडणेकर यांच्या किस कार्पोरेट सर्व्हिसेस या कंपनीला देण्यात आल्याचे या नोटिशीत सांगण्यात आले असून त्याबाबत एसआरएने या लोकांना जाब विचारलेला आहे. त्यामुळे पेडणेकर यांना मला विचारयचे आहे की, तुम्ही संजय अंधारी यांच्याकडून जागा घेतली. हा संजय अंधारी नावाचा माणूस खरंच आहे का? मी किशोरी पेडणेकर तसेच उद्धव ठाकरे यांना आव्हान करतो की त्यांनी संजय अंधारी नावाच्या माणसाला हजर करावे. पेडणेकर यांनी या माणसाशी करार केला आहे. त्यांनी या माणासाला हजर करावे,” असे किरीट सोमय्या म्हणाले. तसेच “पेडणेकर यांच्या कंपनीशी सुनिल कदम या माणसाने करार केला. या माणासाला पेडणेकर यांनी संजय अंधारी म्हणून उभं केलेलं आहे,” असंदेखील सोमय्या म्हणाले.
[ad_2]