[ad_1]
गेल्या दोन दिवसांपासून ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांच्या घरावर झालेल्या हल्ल्याच्या प्रयत्नाची जोरदार चर्चा सुरू आहे. या प्रकारानंतर चिपळूणमधील भास्कर जाधव यांच्या घरासमोर पोलीस बंदोबस्तही वाढवण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापलं असून विरोधकांनी या सर्व गोष्टींसाठी एकनाथ शिंदे सरकार जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. यासंदर्भात आज मातोश्रीबाहेर माध्यमांशी बोलताना भास्कर जाधव यांनी गंभीर आरोप केला आहे.
नेमकं काय घडलं चिपळूणमध्ये?
मंगळवारी कुडाळमध्ये भास्कर जाधव यांनी भाषण करताना नारायण राणे आणि नितेश व निलेश या त्यांच्या दोन्ही पु्त्रांवर टीका केली. यावेळी त्यांनी सत्ताधारी शिंदे गटालाही लक्ष्य केलं. या पार्श्वभूमीवर रात्री उशीरा भास्कर जाधव मुंबईला परतल्यानंतर त्यांच्या चिपळूणमधील घरावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याचं सांगितलं गेलं. यासंदर्भात पाहणी केली असता त्यांच्या घराच्या आवारात दगड, स्टम्प आणि काचेच्या बाटल्या आढळून आल्या. या पेट्रोलच्या बाटल्या असल्याचंही सांगितलं जात आहे. मात्र, यावरून आता भास्कर जाधव यांनी सरकारवर टीकास्र सोडलं आहे.
“मी मुंबईत आलो तेव्हा माझ्या संरक्षणासाठी पोलिसांचा फौजफाटा होता. रात्री ११ ते १२च्या दरम्यान माझी सुरक्षाव्यवस्था काढून घेण्यात आली. प्रत्येक आमदाराला किमान एक किंवा दोन पोलीसांची तरी सुरक्षा असते. पण माझ्यासाठी एकही पोलीस ठेवला नाही. चिपळूण आणि मुंबईतील माझ्या राहत्या घरासमोरचं संरक्षण काढून घेतलं”, असं भास्कर जाधव म्हणाले.
“…तर भास्कर जाधवांनी या गोष्टींची सवय ठेवली पाहिजे”, हल्ल्याच्या घटनेवरून नितेश राणेंचा टोला!
“दोन तासांत हल्ला होतो याचा अर्थ..”
“माझी सुरक्षाव्यवस्था काढून घेतल्यानंतर अवघ्या दोन तासांत माझ्या घरावर हल्ला होतो, याचा अर्थ हा हल्ला सरकारच्याच सहकार्याने गुंडांनी केलाय हे स्पष्ट झालं आहे”, असा आरोप भास्कर जाधव यांनी केला आहे.
‘मी उठून जाऊ का?,” राहुल देशपांडे भाजपाच्या कार्यक्रमात संतापले, ठाकरे गटाच्या दाव्यावर शेलार म्हणाले “कोल्हेकुई….”
“भाजपानंच राजकारणाचा स्तर खाली आणला”
दरम्यान, राजकीय आरोप-प्रत्यारोप करताना खालच्या पातळीची टीकाही केली जात असताना यासाठी दोन्ही बाजू एकमेकांना जबाबदार धरत आहेत. भास्कर जाधव यांनी या सगळ्या प्रकारासाठी भाजपा जबाबदार असल्याचा दावा केला आहे. “अडीच वर्षं उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री होते. आज जे सभ्यतेच्या गोष्टी करतात, नीतीमत्तेचे धडे आम्हाला देतात, मुख्यमंत्र्यांचा मान राखा असं सांगतात, त्या भाजपाच्या नेत्यांचं उद्धव ठाकरेंबद्दलचं एकेक वाक्य काढून बघा. त्यामुळे राजकारणाचा स्तर खऱ्या अर्थानं भाजपाकडूनच घालवण्याचा प्रयत्न झाला आहे”, असं भास्कर जाधव म्हणाले.
[ad_2]