[ad_1]
“भविष्यात पुन्हा एकदा महाराष्ट्रात सत्तापरिवर्तन झालं तरी आश्चर्य वाटण्याची गरज नाही,” असं भाकीत शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊतांनी वर्तवलं आहे. याच वक्तव्यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना नाशिकमधील पत्रकार परिषदेमध्ये प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नावर उत्तर देताना शरद पवार यांनी संजय राऊत यांच्या नावाचा उल्लेख केला मात्र थेट उत्तर देणं टाळलं.
राऊत नेमकं काय म्हणाले?
महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सरकार येऊन २८ दिवस झाले तरी अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्ली दौरे करुनही निर्णय न झाल्याने टीका होत आहे. त्यातच बुधवारी दिल्ली दौऱ्यावर निघालेल्या एकनाथ शिंदेंचा दौरा अचानक रद्द झाल्याने चर्चांना उधाण आलेलं असतानाच दुसरीकडे शिवसेनेचे राऊत यांनी महाराष्ट्रात सत्तांतर होईल असं भाकीत वर्तवलं आहे. “बचाव करण्यासाठी या आमदारांना दुसऱ्या पक्षात विलीन व्हावं लागतं, पण यानंतर ते आपल्याला शिवसैनिक म्हणू शकणार नाहीत. दुसऱ्या पक्षात विलीन होण्यास किती आमदार मानसिकदृष्ट्या तयार आहेत याची आम्हाला कल्पना आहे. आमदार आमच्या संपर्कात आहेत. पुन्हा एकदा सत्तांतर झाल्यास आश्चर्य वाटण्याची गरज नाही,” असं संजय राऊतांनी म्हटलं आहे.
शरद पवार काय म्हणाले?
याच दाव्याच्या संदर्भात पत्रकारांशी शरद पवारांना, “संजय राऊत म्हणतायत की हे सरकार पुन्हा पडेल. फार काही भवितव्य वाटत नाहीय या सरकारचं,” असं विचारलं. या संदर्भात शरद पवार यांनी थेट प्रतिक्रिया देणं टाळलं. संजय राऊतांचा संदर्भ देत विचारण्यात आलेल्या या प्रश्नावर पवारांनी, “आता ते त्यांना विचारा मी काय सांगू?” असा प्रतिप्रश्न पत्रकारांना केला. तसेच पुढे बोलताना, “संजय राऊतांवर मी कशाला कमेंट करु?” असंही पवार म्हणाले.
राऊतांच्या टीकेला मुख्यमंत्र्यांचं उत्तर
संजय राऊतांनी सरकार लवकरच पडेल या दाव्यासंदर्भात बोलताना उत्तर दिलंय. पत्रकारांनी या दाव्यावरुन शिंदेंना विचारलं असता एकनाथ शिंदेंनी टोला लगावत, “ते स्वप्नं पाहत असतात, त्यांना स्वप्नातच राहू द्या” असं उत्तर दिलं होतं.
[ad_2]