Headlines

शिंदे-फडणवीसांमध्ये मतभेद होत आहेत का? पत्रकाराच्या प्रश्नावर शरद पवारांची दोन वाक्यात प्रतिक्रिया, म्हणाले, “मी तर…” | Sharad Pawar answer question regarding differences between Eknath Shinde Devendra Fadnavis

[ad_1]

शिवसेनेत बंडखोरी केल्यानंतर राज्यातील महाविकासआघाडी कोसळून शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आलं. मात्र, त्यानंतर मुख्यमंत्रिपद, मंत्रीमंडळ विस्तार असो की खातेवाटप या ना त्या कारणाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात मतभेदांबाबत तर्कवितर्क लावले गेले. आता अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत्या पार्श्वभूमीवर भाजपाने आपला उमेदवार उभा केला. त्यानंतर पुन्हा एकदा शिंदे-फडणवीसांमध्ये मतभेदाच्या चर्चांना उधाण आलं. याबाबत पत्रकारांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनाच प्रश्न विचारला. त्यावर शरद पवारांनी दोन वाक्यात प्रतिक्रिया दिली. ते रविवारी (१६ ऑक्टोबर) सायंकाळी सिल्व्हर ओक निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

अंधेरी दोन कार्यक्रमांमध्ये दोघेही एकत्र येणं अपेक्षित होतं, तिथे दोघेही एकत्र आले नाही. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात मतभेद तयार झालेत का? असा प्रश्न एका पत्रकाराने विचारला. त्यावर शरद पवार म्हणाले, “मी तर असं काही झाल्याचं ऐकलं नाही. दोघांमध्ये मतभेद असल्याची मला अजिबात कल्पना नाही.”

अंधेरी पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीची भूमिका काय असणार?

अंधेरी निवडणुकीवर शरद पवार म्हणाले, “अंधेरी पूर्व विधानसभेची पोटनिवडणूकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. ही निवडणूक साधारणतः दीड वर्षाच्या कालावधीसाठी आहे. आमदार रमेश लटके यांचे निधन झाल्याने ही जागा रिक्त झाली आहे. भाजपाचे मुरजी पटेल यांनी या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला आहे. महाराष्ट्रात गोपीनाथ मुंडे यांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर पोटनिवडणूक जाहीर झाली होती. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून मी गोपीनाथ मुंडे यांच्या परिवारातील कोणी उमेदवार उभा राहत असेल, तर राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार उभा करणार नाही असा निर्णय घेतला होता.”

“रमेश लटके यांचे महानगरपालिका आणि विधिमंडळातील योगदान व निवडणूक निवडून येणाऱ्या प्रतिनिधीचा कालावधी पाहता ही निवडणूक बिनविरोध करणे योग्य होईल. यातून महाराष्ट्रात योग्य संदेश जाईल,” असे आवाहनही शरद पवार यांनी केले.

शरद पवार पुढे म्हणाले, “मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही ही निवडणूक बिनविरोध व्हावी ही भूमिका मांडली, मात्र भाजप निवडणुकीतून माघार घेण्यास तयार होत नाही. प्रत्येक पक्षाला स्वतःची भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. त्यामुळे तक्रार करण्याचे काही कारण नाही. यापूर्वीही महाराष्ट्रात पोटनिवडणूक झाल्या. त्यावेळी अशी भूमिका घेण्यात आली नाही.”

“याचे कारण आताची ही निवडणूक दीड वर्षासाठी होत आहे. यानंतर विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे वर्ष- दीड वर्षासाठी निवडणूक घेणे टाळता येईल तर बरे होईल. गोपीनाथ मुंडे यांच्यावेळी पोटनिवडणूक घेण्यात आली तेव्हा पावणेपाच वर्षाचा कालावधी होता. अंधेरी पोटनिवडणूकीबाबत सर्व परिस्थितीचा विचार करता अर्ज मागे घेण्यासाठी अजून कालावधी आहे. त्यापूर्वी ही भूमिका मांडली आहे,” असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले.

“महापालिकेने ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर केला नाही. त्यांना कोर्टात जावे लागले. मुंबई महानगरपालिकेने त्यावेळीच योग्य निर्णय घेतला असता तर त्यांना कोर्टात जाण्याची वेळ आली नसती परंतु वेगळी भूमिका मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी घेतली. त्यामुळे कोर्टात जावे लागले. कोर्टाने निर्णय देऊन मुंबई महानगरपालिकेला योग्य संदेश देत योग्य रस्ता दाखवला,” असा टोलाही शरद पवार यांनी यावेळी लगावला.

शरद पवार मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीवरही बोलले. ते म्हणाले, “बीसीसीआय आणि एमसीए निवडणूका होत आहेत. खेळामध्ये आम्ही कोणी राजकारण आणत नाही, राजकीय भूमिका घेत नाही. ज्यावेळी बीसीसीआय अध्यक्ष असताना नरेंद्र मोदी हे सुद्धा गुजरातचे मुख्यमंत्री असल्याने उपस्थित रहात होते. एमसीए ही चांगली संघटना आहे. देशामध्ये राज्य संघटना म्हणून एमसीए ही प्रभावी संघटना म्हणून कार्यरत आहेत. या संघटनेचे साधारणतः ४०० सदस्य असतील पण यापैकी कुणीही राजकारण यामध्ये आणत नाही.”

हेही वाचा : “मराठ्यांसह आम्ही सर्वजण शुद्र, आम्हाला ५,००० वर्षे…”, शरद पवारांसमोर सरस्वती पुजेचा उल्लेख करत छगन भुजबळांचं वक्तव्य

“हिमाचल प्रदेशची निवडणूक लागली पण गुजरातची निवडणूक लागली नाही. याबाबत आश्चर्य व्यक्त करताना निवडणूक आयोगाने सगळ्यांच्या निवडणुका एकत्र घेतल्या असत्या तर निवडणूक आयोगाच्या कामाबाबत ज्या शंका घेतल्या जातात. त्या शंका घेतल्या गेल्या नसत्या. निवडणूक आयोग ही स्वतंत्र मताची संस्था आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाबाबत कोणती शंका उपस्थित होऊ नये अशी अपेक्षा आमची आहे. तशी जबाबदारी निवडणूक आयोग व प्रशासनाची सुद्धा आहे,” हेही शरद पवार यांनी स्पष्ट शब्दात नमूद केले.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *