[ad_1]
अंधेरी-पूर्व पोटनिवडणुकीतून शिवसेनेच्या ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) उमेदवार ऋतुजा लटके यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निवडणूक बिनविरोध करण्याबाबत लिहलेल्या पत्रानंतर भाजपाने निवडणुकीतून माघार घेतली आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपुरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ही घोषणा केली.
राज ठाकरेंनी सर्वांत पहिल्यांदा भाजपाला पत्र लिहून अंधेरी-पूर्व पोटनिवडणूक बिनविरोध करण्याची विनंती केली होती. त्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनीही बिनविरोध करण्यासाठी आवाहन केलं होते. त्यानंतर रविवारी ( १६ ऑक्टोंबर ) भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांची खलबते झाली. अखेर सोमवारी ( १७ ऑक्टोंबर ) चंद्रशेखर बावनकुळे यांनी अंधेरी पोटनिवडणुकीतून माघार घेत असल्याचं जाहीर केलं.
हेही वाचा – भाजपाची माघार अन् राज ठाकरेंची कौतुकाची थाप; फडणवीसांना पुन्हा पत्र लिहित म्हणाले “आज तुम्ही…”
या सर्व प्रकरणावरून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपा आणि राज ठाकरेंवर टीका केली आहे. मुंबई सत्र न्यायालयात संजय राऊतांना हजर करण्यात आले होते. तेव्हा, प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना संजय राऊत म्हणाले, “भाजपाला राज ठाकरेंनी लिहलेलं पत्र हा ‘स्क्रिप्ट’चा भाग होता. शिवसेना अंधेरीची पोटनिवडणूक ४५ हजारांच्या मताधिक्याने जिंकणार होती. भाजपाने या मतदारसंघात सर्वे केला होता. पराभवाची चाहूल लागल्यामुळेच भाजपाने उमेदवारी अर्ज मागे घेतला,” असे राऊत यांनी म्हटलं आहे. ‘एबीपी माझा’ने याबाबत वृत्त दिलं आहे.
“प्रत्येकाशी असलेलं सहकार्याचं नातं…”
भाजपाचे उमेदवार मुरजी पटेल यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर ऋतुजा लटकेंनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. “मी सर्वप्रथम सर्वांचे आभार मानते. सर्व पक्षातील जे वरिष्ठ नेते आहेत. त्यांच्याकडून जी पत्र गेली. त्यांनी जी माझे पती रमेश लटके यांच्या कामाबद्दल आणि त्यांचं प्रत्येकाशी असलेलं सहकार्याचं नातं. प्रत्येकजण म्हणत होतं की माझे सहकारी होते. माझ्या बरोबर होते. त्या कामाची पावती आणि त्यांच्याबरोबर असलेल्या संबंधामुळे आज मला हा सगळ्यांचा आशीर्वाद मिळालेला आहे. त्यामुळे प्रत्येकाचे मी आभार मानते,” असेही ऋतुजा लटकेंनी म्हटलं आहे.
[ad_2]