[ad_1]
रत्नागिरी : हवामान विभागाच्या अंदाजानुसार जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी आणि लांजा तालुक्यात पावसाच्या मुसळधार सरी पडत असून उर्वरित ५ तालुक्यांमध्ये हलका पाऊस झाला. त्यामुळे बळीराजाला दिलासा मिळाला आहे. रत्नागिरी शहरातील मजगाव येथे शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास घरावर झाड पडून मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने घरातील कुणालाही दुखापत झाली नाही.
जिल्ह्यात शुक्रवारी दुपारी अनंत चतुर्दशीच्या दिवशी दुपारनंतर पावसाने जोर धरला. संध्याकाळी उशिरापर्यंत संगमेश्वर आणि चिपळूण तालुक्याला चांगलेच झोडपून काढले. रात्री पावसाचा जोर कमी झाला. मात्र शनिवारी दुपारपासून पुन्हा संततधार सुरू होती. या पावसाबरोबर विजांचाही कडकडाट असल्यामुळे अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला होता. शुक्रवारी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास मजगाव येथे इरफान मुकादम फिरोज मुकादम यांच्या घरावर हापूसचे कलम पडले. या वेळी कुटुंबातील सहा जण झोपेत होते. मोठा आवाज झाल्यानंतर घरातील सगळे जण बाहेर धावले. भलेमोठे झाड घरावर कोसळलेले होते. मात्र सुदैवाने कुणालाही दुखापत झाली नाही. घराची एक बाजू पूर्णत: कोसळली असून सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
हा प्रकार समजल्यानंतर मजगांवचे सरपंच फय्याज मुकादम यांच्यासह ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. घरातील लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. येथील वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. मागील आठवडय़ात पावसाने पाठ फिरवल्यामुळे भातशेती करपण्याची भीती होती. दिवसा पडणाऱ्या कडकडीत उन्हामुळे शेतकऱ्यांची पंचाईत झाली होती. कातळावरील शेतीला सर्वाधिक फटका बसला असता; परंतु पावसाने जोर धरल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
[ad_2]