[ad_1]
पुणे : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत नुकसान भरपाईसाठी पात्र ठरलेल्या १० लाख ५९ हजार शेतकऱ्यांना ८३६ कोटी रुपयांची भरपाई मिळणार आहे. नुकसान भरपाईस पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांपैकी ४९७४ शेतकऱ्यांच्या खात्यावर २.६३ कोटी रुपये जमा झाले आहेत. अन्य शेतकऱ्यांच्या खात्यावरही लवकरच मदतीची रक्कम जमा केली जाणार आहे.
हेही वाचा >>> Aryan Khan Drugs Case: आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील तपासात त्रुटी, एनसीबीच्या अहवालातून खुलासा
कृषी विभागाचे सहसंचालक आणि मुख्य सांख्यिक विनय कुमार आवटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान पीकविमा योजने अंतर्गत राज्यात ९६ लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी पीकविमा घेतला होता. नुकसान भरपाईस पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांपैकी ४९७४ शेतकऱ्यांच्या खात्यावर २.६३ कोटी रुपये जमा झाले आहेत. उर्वरित रक्कम दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यासाठी कृषी विभाग प्रयत्नशील आहे.
जालना, गोंदिया, कोल्हापूर या तीन जिल्ह्यांतील १,४९,६४८ शेतकऱ्यांना ४७.४१ कोटी रुपयांची नुकसान भरपाईची रक्कम त्यांच्या खात्यावर जमा झाली आहे.
महसूल-कृषी विभागाच्या समन्वयाचे यश
राज्यात सातबारा ऑनलाइन झाल्यामुळे ही योजनेची अंमलबजावणी वेगाने आणि पारदर्शी पद्धतीने करण्यात यश आले. ऑनलाइन सातबाराबरोबर पीकविमा संकेतस्थळ संलग्न करण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ, पैसा आणि श्रमाची बचत झाली आहे. यापूर्वी सातबारा, आठ अ चुकीच्या पद्धतीने जोडले जायचे. क्षेत्र कमी असूनही जास्त क्षेत्रावर विमा काढला जायचा. चुकीच्या पद्धतीने अनुदान घेतले जायचे. या सर्व प्रकाराला आळा बसला आहे. त्यामुळे आता योग्य, पात्र शेतकऱ्याला विमा संरक्षणाचा लाभ मिळतो आहे.
हेही वाचा >>> तुमच्यात आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंमध्ये नाराजी आहे का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, “सध्याच्या परिस्थितीत…”
राज्य देशात अव्वल
राज्यात कृषी विभागाच्या वतीने पंतप्रधान पीकविमा योजनेना राबविण्यात येते. ही योजना उत्कृष्टपणे राबविल्याबद्दल राज्याला कोची (केरळ) येथे होणाऱ्या कार्यक्रमात राष्ट्रीय पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे. कृषी आणि महसूल विभागाचे अधिकारी हा पुरस्कार स्वीकारणार आहेत. राज्यात प्रधानमंत्री पीकविमा योजना २०१६-१७ पासून राबविण्यात येते. देशात राबविण्यात येणाऱ्या पीकविमा योजनेत महाराष्ट्राचा सहभाग साधारणत: २० टक्केपर्यंत असतो. पीकविमा योजनेबाबत राज्यात सातत्याने नवनवीन सुधारणा केल्या जात आहेत.
आठ लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर उद्या मदत जमा
मुंबई: नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत ५० रुपयांपर्यंतची कर्जमाफी देण्यात येणार असून, या प्रोत्साहन योजनेअंतर्गत राज्यातील ८ लाख शेतकऱ्यांच्या थेट खात्यावर ५० हजार रुपयांपर्यंतची रक्कम येत्या गुरुवारी जमा होणार आहे.
कर्जाचे नियमित हप्ते भरतात त्यांना प्रोत्साहनपर ५० हजार रुपये इतका भत्ता देण्याची घोषणा तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली होती. त्यानंतर करोनाच्या सावटामुळे राज्याच्या महसुलात घट आणि प्रशासकीय कामाकाजावरील विपरीत परिणाम यामुळे या योजनेची अंमलबजावणी झाली नाही.
सहकार विभागाने स्टेट बँकेला समन्वयक बँक म्हणून नेमले आहे. या प्रोत्साहन योजनेत थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर २५०० कोटी इतका निधी वर्ग केला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात ८ लाख शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यात आणखी काही शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. दुसरा टप्पा पुढील १० दिवसांत सुरू होणार आहे.
जे शेतकरी नियमित कर्जफेड करतात.त्यांना ही प्रोत्साहन रक्कम दिली जाणार आहे. शेतकऱ्यांमध्ये कर्ज घेणे-कर्ज फेडणे याबाबत एक चांगला पायंडा पाडण्यासाठी सहकार विभागाचा हा प्रयत्न आहे. – अनुपकुमार,अपर मुख्य सचिव, सहकार विभाग
‘ओला दुष्काळ जाहीर करा’
मुंबई: राज्यात सततच्या पावसाने शेतकऱ्यांची खरीप व रब्बी हंगामातील पिके वाया गेली आहेत. अजूनही पाऊस थांबण्याचे नाव घेत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. ही बाब लक्षात घेऊन सरकारने ओला दुष्काळ जाहीर करून अडचणीतील शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मंगळवारी केली.
[ad_2]