[ad_1]
सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचा होणार असल्याची चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेत्यांनी याबाबत वक्तव्येही केली आहेत. तसेच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्याबाबतचे बॅनर लावल्याचीही माहिती मिळत आहे. या घडामोडीनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं यामध्ये उडी घेतली आहे. पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? यावरून मनसेनं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंना टोला लगावला आहे.
मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी ट्वीट करत उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. त्यांनी उद्धव ठाकरेंचा उल्लेख शिल्लक सेनेचे प्रमुख आणि आदित्य ठाकरेंचा उल्लेख छोटे नवाब असा केला आहे. संबंधित ट्वीटमध्ये गजानन काळे म्हणाले की, “ऐन दिवाळीत महाविकास आघाडीमध्ये फटाके फुटू लागले आहेत. येणाऱ्या काळात राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होईल, असे विधान राष्ट्रवादीचे नेते करू लागले आहेत. तसेच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी बॅनरही लावले आहेत. त्यामुळे शिल्लक सेनेचे प्रमुख व छोटे नवाब यांचे काय होणार? हा महाराष्ट्राचा अपमान आहे” असा टोला गजानन काळे यांनी लगावला आहे.
नेमकं प्रकरण काय आहे?
पुढची १० ते १५ वर्षं राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेबाहेर राहील, असं विधान कॅबिनेट मंत्री शंभुराज देसाई यांनी केलं होतं. “शिंदे-फडणवीस सरकारने लोकशाही मार्गाने विधानसभेत बहुमत सिद्ध केलं आहे. लोकशाहीत बहुमताचा आदर व्हायला हवा. राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत नाही एवढीच त्यांच्या नेत्यांना खंत आहे. त्यांना सत्तेशिवाय राहता येत नाही. त्यामुळे सत्तेविना ते तळमळत आहेत. पुढची अडीच वर्षं नाही, पण किमान १०-१५ वर्षे तरी त्यांना असंच सत्तेविना तळमळत राहावं लागेल”, असं शंभुराज देसाई म्हणाले होते.
हेही वाचा- “….तर मी घरात घुसून मारेन,” अमेय खोपकरांचा शिवसेना नेत्यांना इशारा, पाहा VIDEO
देसाईंना प्रत्युत्तर देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके म्हणाले की, “जनतेमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी आहे. त्यामुळे पुढचं सरकार महाविकास आघाडीचंच सरकार असणार आहे. राज्याचे पुढचे मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचेच असणार आहेत.” लंके यांच्या विधानानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी सूचक विधान केलं. “अजित पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत, असं अनेक लोकांचं मत आहे. माझंसुद्धा हेच मत आहे. पण शेवटी आपल्याला आकड्यांचं समीकरण लक्षात घ्यावं लागेल. येत्या काळात मित्रपक्षांना विश्वासात घेऊन आमचे पक्षश्रेष्ठी योग्य तो निर्णय घेतील. पक्षश्रेष्ठींनी घेतलेला निर्णय आम्हाला मान्य करावा लागेल” असं रोहित पवार म्हणाले.
[ad_2]