[ad_1]
नवी दिल्ली : भाजपच्या ‘मिशन १४४’अंतर्गत राज्यातील लोकसभा मतदारसंघांची जबाबदारी केंद्रीय मंत्र्यांकडे देण्यात आली आहे. आता राज्यातील आठ केंद्रीय मंत्र्यांकडे प्रत्येकी दोन लोकसभा मतदारसंघांची जबाबदारी दिली जाणार आहे. यासंदर्भातील बैठक दिल्लीत बुधवारी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत झाली.
भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली २०२४ मधील लोकसभा निवडणुकीत राज्यात ४५ जागा लढवल्या जातील. त्यासंदर्भातील पूर्वतयारी पूर्वीच सुरू झाली होती. त्यापुढील टप्प्यात राज्यातील केंद्रीय मंत्र्यांकडेही १६ लोकसभा मतदारसंघांची जबाबदारी दिली जाणार असल्याची माहिती बावनकुळे यांनी दिली.
केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड, भारती पवार, कपिल पाटील, रावसाहेब दानवे या मंत्र्यांवर प्रामुख्याने ही जबाबदारी असेल. याशिवाय केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, नितीन गडकरी, नारायण राणे तसेच राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे घटक पक्ष असलेल्या रिपब्लिकन पक्षाचे खासदार रामदास आठवले यांनाही या मोहिमेत सहभागी करून घेतले जाणार आहे. प्रत्येक मंत्र्याकडे कोणते दोन लोकसभा मतदारसंघ द्यायचे या संदर्भात बैठकीत सविस्तर चर्चा झाली. भाजपची पक्ष संघटना व केंद्र-राज्य सरकार यांच्यातील समन्वयासाठी मुंबईतही बैठक घेतली जाणार असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.
ठाकूर, सीतारामन यांचे दौरे
गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने २५ जागा लढवून २३ खासदार लोकसभेत पाठवले होते आणि एकत्रित शिवसेनेने २३ जागांपैकी १८ जागा जिंकल्या होत्या. शिवसेनेतील बंडखोरीनंतर १२ खासदार शिंदे गटात गेले असले तरी, भाजपने शिंदे गटातील खासदारांच्या मतदारसंघांवरही लक्ष केंद्रित केले आहे. ‘मिशन १४४’अंतर्गत कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी दौरा केला होता. या मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे विद्यमान खासदार आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे देण्यात आली असून त्यांनी दीड महिन्यांपूर्वी या मतदारसंघाचा दौराही केला होता. भाजपच्या या प्रवासी लोकसभा मतदारसंघ मोहिमेची जबाबदारी राज्यातील केंद्रीय मंत्र्यांवरही सोपवली जाणार आहे.
[ad_2]