[ad_1]
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांच्यावर गंभीर आरोप करत काँग्रेसच्या सर्व पदांचा राजीनामा दिला. यानंतर त्यांनी केलेल्या आरोपांची जोरदार चर्चा झाली. या आरोपांविषयी पत्रकारांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना प्रश्न विचारला. यावर उद्धव ठाकरेंनी हे मीदेखील भोगतो आहे, असं उत्तर दिलं. ते सोमवारी (२९ ऑगस्ट) मातोश्रीवर पत्रकार परिषदेत बोलत होते.
उद्धव ठाकरे म्हणाले, “हे मी पण भोगतो आहे. इकडे आनंदी आनंद आहे आणि आनंदाचा कंटाळा आला म्हणून मी घर सोडतो आहे असं कुणीही कधी बोलत नाही. आमच्याकडेही तेच झालं.”
“राजकारणात हे नवीन नाही”
“गद्दारांना नेमकी गद्दारी कशासाठी केली हा त्यांनाही प्रश्न पडलाय. काल काय बोललो, आज काय बोलतोय, उद्या काय बोलायचं असे प्रश्न त्यांना पडत आहेत. हे होत असतं. राजकारणात हे नवीन नाही,” असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.
“शिवाजी पार्कवर शिवसेनेचा म्हणजे आमचाच दसरा मेळावा होणार”
उद्धव ठाकरेंनी दसरा मेळाव्यावरही आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, “कोणताही संभ्रम नाही. शिवाजी पार्कवर शिवसेनेचा म्हणजे आमचाच दसरा मेळावा होणार आहे. संभ्रम निर्माण करणाऱ्यांनी संभ्रम निर्माण करू द्या. शिवसैनिकांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून दसऱ्याला शिवतीर्थावर येण्याची तयारी सुरू केलेली आहे.”
“शिवसेनेचा मेळावा दसऱ्याला शिवतीर्थावरच होणार”
“मुंबई महानगरपालिकेकडून येणाऱ्या परवानगीचा जो तांत्रिक मुद्दा असेल तो त्यांचा ते पाहतील. मात्र, शिवसेनेचा मेळावा दसऱ्याला शिवतीर्थावरच होणार आहे,” असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.
“संघ परिवारातील लोक शिवसेना परिवारात आले”
उद्धव ठाकरे संघ परिवारातील पदाधिकाऱ्यांच्या पक्षप्रवेशावर म्हणाले, “दोन दिवसांपूर्वी संभाजी ब्रिगेडने युती केली. आज संघ परिवारातील लोक शिवसेना परिवारात आले आहेत. हिंगोलीतील मातब्बर लोक शिवसेनेत प्रवेश करत आहेत. आता हे रोजच चालू आहे.”
“महाराष्ट्राची माती मर्दांना जन्म देते, गद्दारांना नाही”
“मला एका गोष्टीचा अभिमान वाटतो आणि आश्चर्यदेखील वाटतं. सर्वसामान्यपणे सत्ताधारी पक्षांकडे पक्षप्रवेशासाठी रांग लागते. मात्र, आज प्रथमच महाराष्ट्रात वेगळं चित्र दिसत आहे. महाराष्ट्राची माती मर्दांना जन्म देते, गद्दारांना जन्म देत नाही. याची प्रचिती दाखवत ही मंडळी शिवसेनेत येत आहे,” असं ठाकरे यांनी म्हटलं.
“बहुजन, वंचितांसह मुस्लीम बांधवदेखील शिवेनेत प्रवेश करण्याच्या तयारीत”
“भाजपाने आम्ही हिंदुत्व सोडल्याची आवई उठवली होती. त्याला छेद देणाऱ्या या पक्षप्रवेशाच्या घटना आहे. बहुजन, वंचितांसह मुस्लीम बांधवदेखील शिवेनेत प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. राज्यात एक वेगळं चित्र निर्माण होत आहे आणि हे चित्र देशासाठी मार्गदर्शक ठरेल,” असंही उद्धव ठाकरेंनी सांगितलं.
हेही वाचा : बंडखोर बांगरांना टक्कर देण्यासाठी उद्धव ठाकरेंची मोठी खेळी, संतोष टार्फेंचा शिवसेनेत प्रवेश
“हिंदूत्वाच्या भ्रामक कल्पनेत फसल्याचं वाटतं त्यांना मातोश्रीचे दरवाजे उघडे”
“अनेक विषय आहेत. त्यावर मी दसरा मेळाव्यात बोलणार आहे. तुर्त ज्यांना ज्यांना हिंदूत्वाच्या भ्रामक कल्पनेत आपण फसले गेलो आहोत असं वाटतं त्यांना मातोश्रीचे म्हणजे शिवसेनेचे दरवाजे उघडे आहेत. त्यांनी केवळ शिवसेनेले भक्कम करण्यासाठी नाही, तर शिवसेनेच्या माध्यमातून महाराष्ट्र, महाराष्ट्राची अस्मिता आणि हिंदुत्व बळकट करण्यासाठी एकत्र यावं,” असं आवाहनही ठाकरेंनी यावेळी केलं.
[ad_2]