[ad_1]
वाई: महाराष्ट्रात लवकरच मोठे प्रकल्प येतील त्यासंदर्भात आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्याशी संपर्कात आहोत. राज्यातील प्रकल्प जाण्याला कोण जबाबदार आहे, या प्रकल्पांवर फडणवीस विस्तृत बोलले, आता मला याबाबत अधिक बोलायचं नाही. कोण काय बोलतोय याकडे मी दुर्लक्ष करतोय, मला कशातही राजकारण करायचे नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
शिंदे हे त्यांच्या मूळ दरे बुद्रुक (ता. महाबळेश्वर) गावी मुक्कामी दौऱ्यावर आहेत. या वेळी त्यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी संवाद साधला. राज्यात येणारे मोठे प्रकल्प गुजरातला गेल्यावरून राजकीय नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर शिंदे यांना विचारले असता त्यांनी मला यात कुठलेही राजकारण करायचे नाही, असे म्हणत राजकीय वादावर भाष्य करणे टाळले. शिंदे म्हणाले, की गुजरातमध्ये गेलेल्या या दोन प्रकल्पांबाबत तसेच महाराष्ट्रात येत असलेल्या उद्योगांबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अगदी विस्तृतपणे भूमिका मांडली आहे. नवीन प्रकल्प आपल्याकडे येत आहेत. मी आणि ते सातत्यानं प्रयत्न करत आहे.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सहकारमंत्री अमित शाह यांच्याशी आमचा सातत्यानं संपर्क आहे. इतर विभागांचे केंद्रीय मंत्री आहेत त्यांच्यासोबतदेखील राज्याच्या विकासासाठी आम्ही संपर्कात असतो. मला या विषयामध्ये राजकारण करायचं नाही. राज्याची भरभराट, राज्याच्या तरुणाईला रोजगार, त्यांना स्वत:च्या पायावर उभं करण्याचं काम आमचं सरकार करेल.
शेतकरी प्रश्नावर बोलताना शिंदे म्हणाले, की शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी केवळ बांधावर जात कोरडा दिलासा देऊन चालत नाही. आम्ही त्यांच्यासाठी निर्णय घेऊ. सत्तेत असताना घरी न बसता आमचे सरकारमधील मंत्री शेतात जात प्रत्यक्ष शेतकऱ्यांशी संवाद साधत आहेत.
[ad_2]