[ad_1]
परतीच्या पावसामुळे राज्यात शेतकरी हवालदील झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. पावसानं सगळी मेहनत मातीमोल ठरवल्यानंतर आता बळीराजा सरकारकडे आशेनं पाहात आहे. या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून सातत्याने ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली जात आहे. मात्र, सरकारकडून त्याबाबत अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही. दुसरीकडे ठाकरे गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी अतीवृष्टीग्रस्त भागाचा पाहणी दौरा केला. यावेळी त्यांनी सरकारकडे शेतकऱ्यांना भरीव मदत देण्याची मागणी केली. मात्र, यावरून आता भाजपाकडून उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं जात आहे.
“अडीच वर्षांत मदत का नाही दिली?”
मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरेंचा दौरा आणि त्यांनी मांडलेली भूमिका यावर टीका केली आहे. “२०१९मध्ये जेव्हा सरकार अस्तित्वात नव्हतं, असा महिन्याभराचा काळ होता. तेव्हा शेतीही माहिती नव्हतं, बांधही माहिती नव्हता, तरी अतीवृष्टीमध्ये गावोगाव फिरले, शेतावरच्या बांधावर फिरले. शेतकऱ्यांना आश्वस्त करून मागणी केली की २५ हजार रुपये हेक्टरी मदत मिळायला हवी. त्यानंतर अडीच वर्षं सरकार होतं. पण २५ हजार हेक्टरी मदत मिळाली नाही”, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
“ते २५ हजार विसरलेत”
दरम्यान, २५ हजार हेक्टरी मदत मागितल्याचं उद्धव ठाकरे विसरले आहेत, असं चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले. “आत्ता एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली आलेल्या सरकारने जूनपासून जे जे शेतकऱ्यांवर संकट आलं, त्या प्रत्येकाचा पंचनामा करायला लावून प्रत्येकाची नुकसानभरपाई दिली. ती दुप्पट दिली. आता त्यांचं गणित बहुतेक कच्चं आहे. ते २५ हजार विसरले, आता ५० हजार रुपये म्हणत आहेत. ५० हजार काय, एक लाख रुपये द्यायला हवे होते. पण मग तुमच्या काळात का नाही दिले?” असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
आमच्याशी गद्दारी ठीक, पण अन्नदात्याशी तरी नको , राज्य सरकार उत्सवी ; उद्धव ठाकरे यांची टीका
काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?
“ज्या गावात शेतकऱ्यांबरोबर चर्चा केली त्या वेळी त्यांनी हेक्टरी ५० हजार रुपये मदत मिळावी अशी मागणी केली. शिवसेना या मागणीच्या पाठीशी आहे. आता काय दिसले म्हणजे ओला दुष्काळ जाहीर होईल, हे माहीत नाही; पण सरकारला पाझर फुटत नसेल तर आसूड घेऊन शेतकऱ्यांनीच त्यांना घाम फोडावा”, असं उद्धव ठाकरे पाहणी दौऱ्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाल होते.
[ad_2]