[ad_1]
मुसळधार पावसामुळे भातसा नदीला पूर आल्याने कल्याण तालुक्यातील वालकस, बेहरे, खडवली-पडघा मार्ग, कुंभारखाण पाडा भागांमधील रस्ते, पूल पाण्याखाली गेल्याने या भागातील रहिवाशांचा इतर भागाशी संपर्क तुटला आहे.
कल्याणमधील सिटी पार्कला पुराच्या पाण्याचा तडाखा
मागील चार दिवसांपासून वालकस नदीवरील पूल पाण्याखाली असल्याने वालकस परिसरातील गावांमधील रहिवासी, नोकरदार, दूध विक्रेते, व्यापारी, विद्यार्थी यांना भिवंडी, कल्याण शहराकडे जाता आलेले नाही. भातसा नदीवरील गावांमध्ये येणाऱ्या बहुतांशी पुलांची उंची कमी आहे. थोडा पाऊस पडला तरी हे पूल यापूर्वी पाण्याखाली जात होते. गेल्या चार दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असल्याने पुराच्या पाण्याने वालकस नदीवरील पूल पाण्याखाली आहे. नदी काठची शेती पाण्याखाली गेल्याने भात लागवडीवर परिणाम होणार असल्याने या भागातील शेतकरी चिंतातूर झाल आहे, अशी माहिती या भागातील रहिवासी दिनेश बेलकरे यांनी दिली.
गावांमध्ये येणाऱ्या रिक्षा, खासगी वाहने, बस पुलावरील पाण्यामुळे बंद –
चार दिवसांपासून पुलावरील पाणी कमी झाले नसल्याने बेहरे, वालकस परिसरातील रहिवाशांनी तीन किलोमीटर पायी चालून रेल्वे मार्गातून खडवली रेल्वे स्थानकात जाण्यास सुरुवात केली आहे. अनेक कष्टकरी, मजूर हे कल्याण, डोंबिवली, टिटवाळा भागात काम करून आपली दैनंदिन उपजीविका करतात. त्यांचे पुरामुळे हाल झाले आहेत. अनेक नोकरदार पायपाटी करून खडवली रेल्वे स्थानकातून पुढचा प्रवास करत आहेत. वालकस, बेहरे गावांमध्ये येणाऱ्या रिक्षा, खासगी वाहने, बस पुलावरील पाण्यामुळे बंद आहेत.
ग्रामस्थांच्या मागणीकडे लोकप्रतिनिधी, प्रशासनाचे दुर्लक्ष –
रात्रीच्या वेळेत या भागातील अनेक रहिवासी जमीन माळरानावरील रस्त्यावरून रेल्वे मार्गातून घर गाठतात. वालकस गावा जवळील पुलाची उंची वाढवावी. खडवली-वालकस-बेहरे रस्त्याची पर्यायी बांधणी करावी, अशी मागणी अनेक वर्षापासून या गावांमधील रहिवासी लोकप्रतिनिधी, शासनाकडे करत आहेत. त्याची दखल घेतली जात नाही, अशी खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली. पर्यायी रस्ते नसल्याने रेल्वे मार्गातून येजा करताना गेल्या काही वर्षात १४ रहिवाशांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती वालकसचे रहिवासी दिनेश बेलकरे यांनी दिली.
वसाहती जलमय झाल्या आहेत –
खडवली पश्चिम भातसा नदी काठी अनेक गृहसंकुले उभी राहिली आहेत. पुराचे पाणी या भागातील गृहसंकुले, बैठया चाळींमध्ये घुसले आहे. कुंभारखाण भागातील रस्ते, वसाहती जलमय झाल्या आहेत. या भागात गटारे, नाल्यांची सोय नसल्याने पुराचे आणि पावसाचे पाणी तुंबून राहत असल्याने ग्रामस्थ हैराण आहेत. बैठया चाळीत आलेले पाणी उपसून गेले दोन दिवसांपासून कुटुंबीय मेटाकुटीला आले आहेत.
[ad_2]