[ad_1]
सोलापूर : बार्शी तालुक्यातील चिखर्डे ग्रामपंचायतीच्या कथित आक्षेपार्ह कारभाराविरोधात गावकऱ्यांनी उपोषण सुरू केले असताना आंदोलनस्थळी एका आंदोलकाच्या दिव्यांग मुलीचा मृत्यू झाला. त्यामुळे हे आंदोलन आणखी तीव्र झाले. तेव्हा अखेर अपर जिल्हाधिकारी संजीव जाधव यांनी आंदोलनस्थळी धाव घेऊन १५ दिवसांत न्याय देण्याचे आश्वासन दिले.
वैष्णवी रामचंद्र कुरूळे (वय १२) असे मृत दिव्यांग मुलीचे नाव आहे. गावातील दोन दिव्यांग मुलांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळत नाही. दिव्यांग मुलांच्या कुटुंबीयांना प्रशासनाकडून अपमानास्पद वागणूक मिळते, याबाबत वारंवार पाठपुरावा करून वरिष्ठ अधिकाऱ्यांकडूनही दाद दिली जात नव्हती. सहा महिन्यांपूर्वी संबंधित कुटुंबीयांनी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे दाद मागितली असता त्यांनी न्याय देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु त्यानंतरही प्रशासनाने दुर्लक्षच चालविले. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या कारभाराच्या विरोधात गावकरी एकवटले आणि त्यातूनच उपोषण सुरू झाले होते.
दरम्यान, उपोषण सुरू असताना वैष्णवी कुरूळे या दिव्यांग मुलीचा आंदोलनस्थळी आकस्मिक मृत्यू झाला. आमदार बच्चू कडूप्रणीत प्रहार संघटनेच्या संजीवनी बारंगुळे यांनी आंदोलनात उडी घेऊन आक्रमक पवित्रा घेतला असता दुसरीकडे प्रशासनाने कारवाईचे आश्वासन आंदोलन थांबविण्यासाठी प्रयत्न सुरू केले असता संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होईपर्यंत मृत दिव्यांग मुलीवर अंत्यसंस्कार करणार नाही, प्रसंगी मृतदेह सोलापुरात जिल्हाधिकारी कार्यालयात नेऊन आंदोलन सुरू करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला. तेव्हा मात्र प्रशासनाने हालचाली सुरू केल्या. जिल्हाधिकारी शंभरकर यांच्या आदेशानुसार अपर जिल्हाधिकारी संजीव जाधव यांनी चिखर्डे गावात येऊन आंदोलकांचे म्हणणे ऐकून घेतले. तत्कालीन ग्रामविकास अधिकारी डी. के. कांबळे यांच्या निलंबनाचा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे पाठविण्यात आला आहे. पीडित कुटुंबीयांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याच्या अनुषंगाने प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. १५ दिवसांत दोषींवर कायदेशीर कारवाई होईल, असे अपर जिल्हाधिकारी जाधव यांनी सांगितले.
[ad_2]