[ad_1]
शिर्डीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं दोन दिवसीय ‘मंथन शिबीर’ सुरू आहे. यासाठी राष्ट्रवादीचे अनेक बडे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, आमदार, खासदार शिर्डीत दाखल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर पक्षाच्या आगामी वाटचालीविषयी चर्चा होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. मात्र, त्याआधीच जयंत पाटील आणि अजित पवार यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखालील सरकार कधी कोसळणार, याविषयी केलेलं विधान चर्चेचा विषय ठरलं आहे. यासंदर्भात आता शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया आली असून थेट अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात शीतयुद्ध सुरू असल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच, दिल्लीमध्ये झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिवेशनात घडलेल्या प्रसंगाचाही संदर्भ देण्यात आला आहे.
जयंत पाटलांचं सूचक विधान
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीच्या शिर्डीतील अधिवेशनानंतर राज्यातील सरकार पडेल, असं विधान केलं आहे. त्यापाठोपाठ विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी १४५ आमदारांचा पाठिंबा असेपर्यंत हे सरकार टिकेल, अशा आशयाचं विधान केलं. त्यामुळे सरकार कोसळण्याविषयी चर्चा सुरू झाली असताना त्यावर शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर परखड शब्दांत टीका केली आहे.
पुण्यात बॅनरबाजीवरून भांडणं?
नरेश म्हस्के यांनी माध्यमांशी बोलताना पुण्यात राष्ट्रवादीच्या बैठकीत बॅनर लावण्यावरून भांडणं झाल्याचा दावा केला. “अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात शीतयुद्ध सुरू आहे. काल-परवा पुण्यात बॅनर लावण्यावरूनही बैठकीत कार्यकर्त्यांमध्ये भांडणं झाली. जयंत पाटील यांनी व्यासपीठावरून ‘मी अजित पवार यांच्यापेक्षा सीनीयर आहे, सात वेळा निवडून आलो आहे, अजित पवार लोकसभेत निवडून आले होते, पण मी विधानसभेत सीनिअर आहे’, अशी वक्तव्य केली. यावरून समजतंय की काय सुरू आहे”, असं नरेश म्हस्के म्हणाले आहेत.
“९५ साली अजित पवार कुठे होते? तेव्हा…”, ‘त्या’ विधानावरून शहाजीबापू पाटलांचा खोचक सवाल; जयंत पाटलांनाही टोला!
“अजित पवार सकाळी शिवसेना-भाजपा युतीच्या विरोधात बोलले. मग ते बोलले की मलाही बोलायला पाहिजे, असं वक्तव्य पाटील यांनी केलं आहे. यांच्यात आम्ही किती सेना-भाजपा युतीविरोधात बोलतो यासाठी स्पर्धा लागली आहे. त्यासाठी ही सगळी वक्तव्य येत आहेत”, असंही जयंत पाटील म्हणाले.
दिल्ली अधिवेशनातील ‘तो’ प्रसंग!
दरम्यान, दिल्लीत नुकत्याच झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिवेशनात अदित पवार नाराज झाल्याचा दावा नरेश म्हस्के यांनी केला आहे. “अजित पवारांना आज सकाळी भाषण करू दिलं यासाठी आयोजकांना धन्यवाद दिले पाहिजेत. नवी दिल्लीत नुकतंच राष्ट्रीय अधिवेशन झालं होतं. जेव्हा जयंत पाटील यांच्या नावाची घोषणा भाषणासाठी केली गेली, तेव्हा कार्यकर्त्यांनी अजित पवारांचं नाव घेतलं. अजित पवार ताडकन सभागृहातून निघून गेले. शरद पवार बोलतानाही अजित पवारांचं नाव घेतलं गेलं. पण अजित पवारांनी भाषण केलं नाही. सुप्रिय सुळे बोलवायला गेल्या असतानाही अजित पवार भाषणासाठी आले नाहीत. शेवटी शरद पवारांचं भाषण सुरू झालं, तेव्हा अजित पवार व्यासपीठावर आले”, असा दावा नरेश म्हस्के यांनी केला आहे.
[ad_2]