[ad_1]
सांगलीतील जत तालुक्यातील लवंगा गावात चार साधूंना मारहाण करण्यात आली आहे. मुलं चोरण्याची टोळी असल्याच्या संशयावरुन ही मारहाण करण्यात आली आहे. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. राजकीय क्षेत्रातही या घटनेचे मोठे पडसाद उमटले आहेत. मारहाणीच्या या घटनेनंतर पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे. आत्तापर्यंत पोलिसांनी ६ आरोपींना ताब्यात घेतलं असून आणखी १० ते १२ आरोपींचा शोध सुरु असल्याची माहिती पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी दिली.
हेही वाचा- VIDEO : सांगलीत चार साधूंना बेदम मारहाण; पालघर घटनेची पुनरावृत्ती थोडक्यात टळली
मुलं चोरणारी टोळी समजून साधूंना मारहाण
उत्तरप्रदेशमधील मथुरा येथील चौघे साधू हे कर्नाटकला देवदर्शनासाठी आले होते. त्यानंतर ते विजापूरवरुन जत तालुक्यातल्या लवंगामार्गे पंढरपूरला देवदर्शनासाठी निघाले होते. या साधूंनी गावातील एका मुलाला रस्ता विचारला. मात्र, त्या तरुणाला हे साधू मुलं चोरणारी टोळी असल्याचा संशय आला आणि त्याने ही माहिती गावकऱ्यांना दिली. याच संशयावरुन ग्रामस्थांनी साधूंना गाडीतून बाहेर काढून बेदम मारहाण केली. त्यांना लाठी-काठी आणि पट्टयाने जबर मारहाण करण्यात आली. या मारहाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
पोलिसांच्या मध्यस्थीनंतर साधूंची जमावाकडून सुटका
अखेर पोलिसांनी मध्यस्थी करत साधूंना जमावाच्या तावडीतून सोडवले. साधूंकडील अधारकार्ड आणि त्यांची संपूर्ण चौकशी केल्यानंतर ते खरचं कोणतीही मुलं चोरणारी टोळी नसून, देवदर्शनासाठी पंढरपूरला जात असल्याचं समोर आलं आहे.
हेही वाचा- “…हे फेसबुक लाइव्ह मुख्यमंत्र्यांचं सरकार नाही”; पालघर साधू हत्याकांडाची आठवण करुन देत राम कदमांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
राम कदम यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
मारहाण करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. भाजपा आमदार राम कदम यांनी ट्वीट करत दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच हे फेसबुक लाइव्ह मुख्यमंत्र्यांचं सरकार नाही शिंदे-फडणवीसांचं सरकार आहे. दोषींवर कारवाई होणारचं अस ट्वीट कदम यांनी केलं आहे. एवढचं नाही तर दोन वर्षांपूर्वी पालघरमध्ये जमावाकडून झालेल्या साधूंच्या हत्येवरुनही त्यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. ठाकरे सरकारने साधूंवर अन्याय केला असल्याचा आरोप कदमांनी केला आहे.
[ad_2]