[ad_1]
लम्पीमुळे जनावरे मृत्यू पावल्यास शेतकऱ्यांना मदत
मुंबई: लम्पी चर्मरोगामुळे जनावरांचा मृत्यू झाल्यास सबंधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचा निर्णय सोमवारी मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार नुकसान भरपाईसाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यासाठी एक कोटी रुपयांची तरतूद करण्याचा आदेश देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे पशु संवर्धन विभागीतल रिक्त ११५९ पदे त्वरित बाह्यस्त्रोताद्वारे भरण्याचा निर्णयही घेण्यात आला.
राज्यातील काही भागात गाई-बैलांना लम्पी चर्मरोगाची लागण होत असून वेगाने ही साथ पसरत आहे. त्यावर उपाययोजना करण्याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाली. यावेळी ज्या शेतकरी किंवा पशुपालकांचे पशुधन या आजारामुळे मृत्यू पावले आहेत. त्यांना राष्ट्रीय आपत्ती निवारण धोरणामधील निकषानुसार राज्य शासनाच्या निधीतून भरपाई देण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी संबधित जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात येणार आहेत. लम्पी चर्मरोगाच्या नियंत्रणासाठी आवश्यक लस, औषधी, साधनसामुग्री अशा विविध बाबींवरील खर्चासाठी जिल्हा नियोजन समित्यांनी एक कोटी रुपयांचा निधी तातडीने उपलब्ध करून देण्याचा आदेशही देण्यात आले आहेत.
पशुसंवर्धन विभागातील रिक्त पदांबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली. राज्यस्तरीय पशुधन पर्यवेक्षकाची २८६ पदे आणि जिल्हा परिषद स्तरावरील ८७३ अशी एकूण १ हजार १५९ रिक्त पदे बाह्यस्त्रोताद्वारे भरण्यात येणार आहेत. तसेच पशुधन विकास अधिकारी गट-अची २९३ रिक्त पदे लोकसेवा आयोगाकडून शिफारस होऊन नियमित स्वरूपात भरेपर्यंत किंवा ११ महिन्यांच्या कालावधीसाठी मानधनावर बाह्यस्त्रोताद्वारे भरण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.
लम्पी आजाराबाबत मदतीसाठी पशुपालकांनी पशुवैद्यकीय दवाखान्यात अथवा विभागाचा टोल फ्री क्रमांक १८००२३३०४१८ अथवा राज्यस्तरीय कॉल सेंटरमधील पशुसेवेचा टोल फ्री क्रमांक १९६२ देण्यात आला आहे, अशी माहितीही मंत्रिमंडळ बैठकीत देण्यात आली.
[ad_2]