[ad_1]
राज्यात शिवसेना आणि भाजपा यांची फारकत झाल्यानंतर या दोन्ही पक्षांनी एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडली नाही. मात्र, आता खुद्द शिवसेनेतच फूट पडून शिंदे गट बाजूला झाल्यानंतर या दोन्ही बाजूंकडून एकमेकांवर कुरघोडीचं राजकारण सुरू झालं आहे. शिंदे गटातील आमदारांचा उल्लेख शिवसेनेकडून गद्दार असा केला जात असताना शिंदे गटाकडून देखील उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला लक्ष्य केलं जात आहे. आज राज्यभरात गणेशोत्सवाचा उत्साह असताना नेतेमंडळींनी याचं निमित्त साधून टोलेबाजी केली आहे. शिवसेना आमदार आणि विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी त्यांच्या घरी बाप्पांची प्राणप्रतिष्ठा केल्यानंतर माध्यमांशी बोलताना शिंदे गटावर टीकास्त्र सोडलं.
अंबादास दानवेंनी आज त्यांच्याघरी सहकुटुंब गणरायाची प्राणप्रतिष्ठा केली. यानंतर माध्यमांनी गणरायाला काय साकडं घातलं? यासंदर्भात विचारणा केली असता त्यांनी शिंदे गटावर टीकास्त्र सोडलं. तसेच, पुन्हा महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात हिंदुत्वाचा झंजावात यावा, अशी अपेक्षा देखील व्यक्त केली.
“काही लोकांच्या मनात दुर्बुद्धी आल्याने…”
“न्यायालयाच्या निकालाविषयी मी बोलणं संयुक्तिक राहणार नाही. काल-परवा एक नेते त्यावर बोलले आहेत. पण नक्कीच आम्हाला न्यायाची अपेक्षा आहे”, असं अंबादास दानवे यावेळी म्हणाले. “उद्धव ठाकरेंसारखं एक सालस आणि सर्वांना सोबत घेऊन चालणारं नेतृत्व राज्याला लाभलं होतं. काही लोकांच्या मनात दुर्बुद्धी आल्यामुळे बाजूला सारलं गेलंय”, असा टोला दानवेंनी यावेळी लगावला.
कंत्राटी मुख्यमंत्र्यांच्या टीकेवरून नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंना टोला; म्हणाले, “उद्धव ठाकरे यांची…”
“येत्या काळात हिंदुत्वाचा झंजावात…”
“उद्धव ठाकरेंसमोर मुख्यमंत्रीपदाची खुर्ची म्हणजे छोटी खुर्ची आहे. उद्धव ठाकरेंचं नेतृत्व फक्त महाराष्ट्र नाही, तर देशाच्या वेगवेगळ्या विषयांना स्पर्श करणारं नेतृत्व आहे. त्यामुळे येत्या काळात त्यांच्याच नेतृत्वाखाली पुन्हा एकदा महाराष्ट्रात आणि देशातही हिंदुत्वाचा झंजावात येऊ दे अशी प्रार्थना मी गणरायाला केली आहे”, असं देखील अंबादास दानवे यावेळी म्हणाले.
[ad_2]