सोलापूर, दि 15 : पंढरपूरच्या आषाढी वारीबाबत तीस मे नंतर निर्णय घेतला जाईल, असे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज येथे सांगितले.
पंढरपूरच्या आषाढी वारीबाबत चर्चा करण्यासाठी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात बैठक झाली. या बैठकीत व्ही. सी.द्वारे पालकमंत्री दत्तात्रय भरणे सहभागी झाले. त्यानंतर त्यांनी याबाबत माहिती दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीस पंढरपूरच्या नगराध्यक्षा साधनाताई भोसले, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर,विठ्ठल रुक्मिणी मंदीर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ अतिरिक्त् जिल्हाधिकारी संजीव जाधव, पंढरपूरचे उपविभागीय अधिकरी सचिन ढोले, पंढरपूरचे नगरपरिषद मुख्यधिकारी अनिकेत मानोरकर,आदी उपस्थित होते.
बैठकीत पालकमंत्री भरणे यांनी नगराध्यक्षा भोसले, श्री. औसेकर महाराज, जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन यांच्या वारीच्या नियोजनाबाबत भूमिका जाणून घेतल्या या भूमिका त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कळवल्या.
नगराध्यक्षा भोसले यांनी सध्याची कोरोनाची परिस्थिती पाहता यंदा आषाढी वारी भरवली जाऊ नये. पंढरपूरकरांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित होऊ शकतो, असे सांगितले.
श्री. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी वारी सोहळा प्रातिनिधीक स्वरुपात आयोजन करुन संत परंपरा पाळली जावी. मात्र याबाबत राज्य शासनाच्या निर्णयाचे पालन केले जाईल, असे सांगितले.
पालकमंत्री भरणे यांनी वारीच्या नियोजनाबाबत जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्याशी चर्चा केली.