[ad_1]
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदार आणि १२ खासदारांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेना पक्षाला मोठं खिंडार पडलं आहे. बहुसंख्य आमदार आणि खासदार शिंदेगटाकडे असल्याने मूळ शिवसेना कुणाची याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. दरम्यान, बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे खरे वारसदार नेमके कोण आहेत? यावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापत आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या विचारांचे आम्हीच खरे वारसदार असल्याचा दावा शिंदे गटाकडून सातत्याने केला जात आहे.
याच पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते रावसाहेब दानवे यांनी उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका केली आहे. राजाच्या पोटी राजा जन्माला येणं ही पूर्वीचं समीकरण असायचं. पण आता पेटीतून राजा जन्माला येतो. उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांना तिलांजली दिली, त्यामुळे ते आता राजकीय वारस राहिले नाहीत, अशी टीका दानवे यांनी केली आहे. ते एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलत होते.
हेही वाचा- “राज ठाकरे यांनीच दसरा मेळावा घ्यावा” मनसैनिकांची राज ठाकरेंना पत्राद्वारे विनंती
सध्याच्या राजकीय स्थितीवर भाष्य करताना रावसाहेब दानवे म्हणाले की, “पूर्वीच्या काळी राजा हा पोटातून जन्म घ्यायचा. राजाच्या पोटी जो जन्माला यायचा, तो राजा असायचा. मग तो आंधळा असो… पांगळा असो… बहिरा असो… किंवा मुका असो… तो राजा असायचा. पण आता राजा हा पेटीतून जन्माला येतो. ज्याच्या बाजुने जास्त लोकं असतील, तो राजा. त्यामुळे उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांचे वारस आहेत, ते बाळासाहेबांच्या संपत्तीचे वारस आहेत. बाळासाहेबांच्या विचारांचेही ते वारस होते. पण बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली देऊन ते दुसरीकडे गेलेय त्यामुळे ते आता बाळासाहेब ठाकरेंचे राजकीय वारस राहिले नाहीत.”
[ad_2]