[ad_1]
देशाच्या १६ व्या राष्ट्रपतीपदासाठी आज, सोमवारी होणाऱ्या निवडणुकीत भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना ७० टक्क्यांपेक्षा अधिक मतं मिळतील असा विश्वास महाराष्ट्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीनिमित्त मतदान करण्यासाठी भाजपाचे आमदार विधानभवनामध्ये आले त्यावेळी चंद्रकांत पाटील यांनी प्रसारमाध्यांशी संवाद साधला. भाजपाचे आमदार आज देशभरातील वेगवेगळ्या विधानसभांमध्ये बसने दाखल झाले. मुंबईमध्येही हेच चित्र पहायला मिळालं. यावरुनच काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी भाजपावर टीका केली. चंद्रकांत पाटील यांनी पटोलेंच्या या टीकेलाही उत्तर देताना भाजपा बसमधून आमदार का आणतं याबद्दल खोचक शब्दांमध्ये भाष्य केलं.
राज्यसभा निवडणुकीमध्ये शिवसेना सोबत नसतानाही १० मतं अधिक पडली. तर विधानपरिषदेमध्येही शिवसेना सोबत नसताना २२ मतं अधिक मिळाली. आता शिवसेना सोबत आहे. शिवसेना भाजपा एकत्र मिळून फार जास्त मतं मिळतील. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस हे २०० मतं मिळतील असं सांगत असेल तरी त्यापेक्षाही अधिक मतं मिळतील,” असा दावा चंद्रकात पाटील यांनी केलाय.
भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या द्रौपदी मुर्मू आणि विरोधकांचे संयुक्त उमेदवार माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांच्यात सरळ लढत होणार आहे. “यशवंत सिन्हा यांच्यासाठी प्रचार, बैठकीही कमी झाल्या. त्यांचा दौराही रद्द झाला. त्यांच्या उमेदवारीमध्ये कोणाला रस आहे असं मला वाटतं नाही,” असा टोलाही चंद्रकांत पाटलांनी लागवला. उद्धवजींनी पाठींबा जाहीर केल्याने मतदानाचा आकडा १८२ झालाय. म्हणजे २०० ला १८ च मतं कमी आहेत. त्यामुळे २०० पेक्षा नक्कीच जास्त मतं मिळतील, असा विश्वास चंद्रकांत पाटलांनी व्यक्त केलंय.
भाजपा बसमधून आमदार आणतं, या नाना पटोलेंच्या टोल्यावर प्रत्युत्तर देताना चंद्रकांत पाटील यांनी, भाजपा आपल्या पक्षाला एक कुटुंब मानतो. परिवाराच्या प्रत्येक सदस्याची आम्ही काळजी घेतो. ते आजारी असले तर कसे पोहोचणार. त्यांची खाण्याची, राहण्याची व्यवस्था आहे की नाही, ते विधानभवनामध्ये कसे पोहचणार यासारख्या गोष्टींची काळजी घेतो. भाजपा आपल्या कार्यकर्त्यांची, नेत्यांची काळजी घेणारा पक्ष आहे. म्हणूनच आम्ही सर्वांना एकत्र बोलवलं. एकत्र आले तर एक दोन आमदार नाहीयत असं लक्षात आलं तर काय झालं वगैरे विचारपूस केली जाते. आजारी असतील तर त्यांना आणण्यासाठी विशेष व्यवस्था केली जाते, असंही भाजपा प्रदेशाध्यक्षांनी सांगितलं. अशा पद्धतीने एकमेकांची काळजी घेणं, कुटुंब म्हणून पक्षातील सदस्यांना वागणं हे त्यांना जमत नाही, म्हणून त्यांना असं वाटतं. मात्र ही आमचे संस्कृती आहे, असं म्हणत पाटील यांनी काँग्रेसला आपले आमदार सांभाळता येत नाहीत, असा टोला लगावला.
गुप्त मतदान असल्याने विरोधी पक्षांमधले अनेक आमदार सद्सद्विविवेकबुद्धीला स्मरुन मुर्मू यांना मत देतील असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.
[ad_2]