मासिक पाळी हि नैसर्गिक प्रक्रिया असून यातून सृष्टीची निर्मिती होते. असे असले तरी समाजातील काही विशिष्ट अनिष्ट रूढी परंपरांनी मासिक पाळी व महिलांना एका विशिष्ट चौकटीत बसवल आहे. मानवाच्या गर्भातून जन्म होतो तो मानवाचाच ना परंतु लिंग पाहून त्या मानवाला स्त्री किंव्हा पुरुष म्हणून घडवलं जात. बाईला बाईपण चुकत नाही हेच खरे. मग ती कोणीही असो. स्त्री म्हणून जन्माला आल्यावर जे जे काही म्हणून तिने भोगायचे, अनुभवायचे असते, ते ते सगळे झाल्याशिवाय तिला पूर्णत्त्व मिळतच नाही. पाळण्यात निष्पापपणे झोपून राहणाऱ्या लहान मुलीलाही अगदी सहजपणे आजूबाजूच्या लोकांकडून ती स्त्री असल्यासारखी वेगळी ट्रीटमेंट मिळत राहते. मुलगा झाला, तर पेढे आणि मुलगी झाली तर बर्फी किंवा जिलेबी हे समीकरणही त्याचंच द्योतक. वास्तविक पाहता कोणत्याही पुस्तकात, धर्मग्रंथात याचा उल्लेख नसेल, तरीही केले तसेच जाते पण स्त्रीकडे नेहमी हिच्याकडून काहीतरी मिळेल या अपेक्षेने बघितले जाते. हळुवारपणा, सोशिकता, सहनशीलता, सर्जनशीलता, शुश्रूषाभाव, करुणा, प्रसंगावधान राखणारी, सर्वांचे भरणपोषण करणारी, मोठे कुटुंब एका सूत्रात बांधून ठेवण्याची क्षमता असणारी, घराला घरपण देणारी, संवेदना आणि सहवेदना असणारी, सौंदर्य आणि नजाकत आणणारी म्हणजे स्त्री.त्याच बरोबर जन्मलेल्या अर्भकाला स्त्री व पुरुष नावाच्या दोन सामाजिक चौकटीत अडकवल जात. मग हीच चौकट त्या मानवी जीवना भोवती लक्ष्मण रेखे सारखी वावरत राहते. जर चुकून कुणी ही रेख ओलांडायचा प्रयत्न केला तर तिच्यावर सामाजिक बहिष्कारही टाकले जातात,तर कधी कधी ती अत्याचाराची बळी ही ठरते. अगदी वयात आल्यापासून तिच्याशी ‘ती’च्या विषयी बोलण्याकरिता तिची ‘ती’ पुढाकार घेताना खूप कमी प्रमाणात दिसून येते. म्हणूनच मग या चौकटीत तिचे माणूसपणाचे पंख छाटले जातात व तीचं बाईपण कोंडल जातं व पुढे तेच बाईपण तीला जस मिळालं तसचं ती मिरवत राहते. तीच्या कडे क्षमता असताना असल्याने बाई’माणूस’ होण्यासाठी ती धडपडत करताना खूप कमी प्रमाणात आढळून येते. जर ती बाईपणाला मागे सारून पुढे येणाच्या प्रयत्न करू लागली तरी पुन्हा समाज नावाचा प्राणी तिला अडसर ठरत जातो. अगदी इतका की तिने काय परिधान करावं,तिने कोणती भाजी बनवावी,उशाचा कलर कोणता असावा,तिने बाहेर कधी जावं,तिने किती नटाव,किती नटू नये,तिनी काय करावं,काय करू नये हे सारं अगदी मासिक पाळी च्या सुरुवाती पासून ते म्हातारपणा पर्यंत या ना त्या भूमिकेतून तिच्यावर लादलं जातचं. यामुळे तिच्यातल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गळा गोठून मृत्यू होतो मग ती उरते केवळ कामकरी. इतकं काम करून जबाबदारी पेलून हि महिन्याकाठी स्वतःच्या आरोग्यासाठी तीस-चाळीस रुपये खर्च करताना ही मागे सरते ती तर कधी तिच्या पुरुषीसत्ताक पुरुषाजवळ पॅड करीता पैशे कसे मागायचे म्हणून स्वतःच्या जीवाशी,आरोग्याशी खेळत राहते ती. ग्रामीण भागातल्या असो वा शहरी भागातील किंव्हा अगदी राष्ट्रीय पासून ते आंतर राष्ट्रीय पातळीवरील जिथे जिथे महिला आहेत तिथे तिथे मासिक पाळी विषयी गैरसमज हमखास आढळतात. अहो इतकंच काय जस गाव बदलली की भाषा बदलते तसे गाव बदलली की पाळीच्या प्रथा हि बदलतात. २८ मे हा जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिन म्हणून साजरा करतात व ते का करतात याच उत्तर हि खुप महिलांकडे नसल्याचे आढळते. एकीकडे आधुनिकरणाचे गोडवे गायचे आणि दुसरी कडे केवळ अंधश्रद्धा,भीती पोटी बुद्धी गहाण ठेवून शरण जात त्याच त्या जुन्या अनिष्ट रूढी,परंपरा पाळत राहायच्या अगदी अशिक्षित महिले पासून ते सु सुक्षित महिले पर्यंत. हे असंच किती दिवस चालायचं ! हे थांबायला हवे ! आणि हो या करिता हल्ली प्रयत्न की खूप चालू आहेत पण त्या प्रयत्नांच्या प्रमाणात ज्यांच्या साठी हे सारं केलं जातं त्या महिलांकडून मात्र हवा तसा प्रतिसाद मिळण्याची शक्यता कमीच आढळून येते. तरी आजची परिस्थिती पाहता मासिक पाळीवर भाष्य तरी करता येत नाहीतर मी कामाला सुरुवात केली तेव्हा मासिक पाळी हा शब्द उच्चारण देखील अपमानच ठरवलं जायचं. तर कधी तो शब्द कानी पडताच कित्येकांच्या माना खाली हि जायच्या,काही प्रमाणात हे आजही आढळून येते. पण हल्ली मासिक पाळी या विषयावर चित्रपट, माहितीपट तयार केले जाऊन याबाबतीत अधिक जनजागृती करण्यात येत आहे. महिलांसह पुरूष देखील अधिक समजूतीने मासिक पाळीवर संवाद करतांना दिसत आहे. पारंपारिक मतभेद, गैरसमजुती आणि परंपरा याचा विचार करता मासिक पाळीबद्दलची होणारी चर्चा यापासून दूर जात स्त्रीत्वापर्यंत पोहचली आहे. या विषयी अधिक मोकळेपणाने प्रत्येक महिलेला कसे बोलता येईल याचा देखील विचार करणे आवश्यक आहे कारण मासिक पाळी आल्यामुळे तिला वेळेवर योग्य मार्गदर्शन न मिळाल्यामुळे एका १२ वर्षाचे मुलीने आत्महत्या केली होती तर कुरमा,छापाडी (मासिक पाळी आल्यामुळे घराबाहेर झोपडीत राहणे) अश्या प्रथांमुळे कित्येक मुलींना प्राण गमवावे लागतात आणि या साऱ्या प्रथा या २१ व्या आधुनिक शतकातही पाळल्या जातात.जर हे असच चालू राहिले तर अजून कित्येक मुलींचा बळी जाण्यास वेळ लागणार नाही म्हणून आपण सर्वांनी मिळून हे वेळीच थांबवायला हवं ! मासिक पाळीमुळे मुलींच्या, महिलांच्या शिक्षणात किंवा नोकरी, व्यवसायात कोणती अडचण येणार नाही असा प्रयत्न या जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिनाच्या निमित्ताने आपण करूया.जर तुम्हाला वाटत ना,समाजाची चौकट मोडू नये तर नका मोडू. पण मला वाटते की समाजाची चौकट मोडता आली नाही तरी “विस्तारता” मात्र नक्की येते आणि तीच समाजाची चौकट विस्तारण्याचा आपण संकल्प पूर्वक प्रयत्न करूया.
https://absnewsofficial.blogspot.com/2020/05/Poojadatta.html
लेखन : राहुल मीनाक्षी शिवानंद बिराजदार ९६ ७३ ८१ ४० ५८ ( ब्लीडसेफली या मोहिमे अंतर्गत महाराष्ट्रामध्ये लैंगिकता शिक्षण प्रोबोधनाचे कार्य करतात )
खुपच छान माहिती सांगितली आहे..धन्यवाद राहूल सर. .
मनःपूर्वक धन्यवाद
Nice one